भाऊ ठाकूर
राहू – दौंड तालुक्यात यंदा ऊस गळीत हंगाम गोड होणार आहे. हंगामात राहू बेट परिसरातील ऊस उत्पादकांना अच्छे दिन येण्याची शक्यता वाढली आहे. उसाची उपलब्धता आणि पावसाचे प्रमाण कमी असल्याने होणारी संभाव्य उत्पादन घट, आदी कारणांमुळे उसाची पळवापळवी होणार आहे.
दौंड तालुक्यातील सर्वांत सधन पट्टा म्हणून राहू बेट ओळखला जातो. उसाचे आगार, बारमाही उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे बारमाही गुऱ्हाळघरे सुरू असतात.एवढ्या मोठ्या प्रमाणात राहू बेट परिसरात ऊस उत्पादित होतो.परंतु याचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे.
अतिरिक्त ऊस झाल्यास गुऱ्हाळघरांचे मालक बाजारभाव पाडून ऊस घेतात. ऊस उपलब्ध असल्यामुळे कारखाने देखील मनमानी करतात. स्पर्धा नसल्यामुळे कारखाने बाजारभाव देखील मोठ्या प्रमाणात कपात करतात. परंतु बेटात फक्त दोन कारखान्यांना ऊस जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पर्याय नव्हता.
बेटात दौंड शुगरसारख्या मोठ्या कारखान्याचे गट कार्यालय आल्याने स्पर्धा वाढणार आहे.राहू गटात पाच कारखान्यांनी गट कार्यालये उघडली आहेत. त्यामध्ये दौंडमधील भीमा पाटस, दौंड शुगर दौंड, अनुराग यवत, श्रीनाथ म्हस्कोबा पाटेठाण तर शिरूरमधील व्यंकटेशकृपा जातेगाव या कारखान्यांची गट कार्यालये ही एका राहू गटामध्ये उघडली आहेत.
एकेकाळी अनेकवेळा उसाचे अतिरिक्त उत्पादन होऊन ऊस बांधावर तोडून टाकावा लागत होता. काहीवेळा वाहतूक करणारी वाहने, तोडणी, स्लीपबॉयला चिरीमिरी दिल्याशिवाय टिपरी हालत नव्हती. परंतु आजस्थितीत मोठा फरक पडला आहे. परंतु याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे.
वाहतूकदार मालामाल
ज्या गटातून कारखान्याला ऊस वाहतूक करायचा आहे. तेथील स्थानिक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रक असतील तर गाळपाला जास्त ऊस मिळतो, हे सूत्र आहे. त्यामुळे वाहतुकीच्या वाहनासाठी स्पर्धा वाढून वाहतूकदारांना देखील चांगले दिवस आले आहेत. मोठ्या प्रमाणात ऍडव्हान्स देऊन वाहने आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाहतूकदारांमध्ये बहुतांश हे स्थानिक शेतकरी आहेत.
चर्चा दौंड शुगरची
दौंड शुगर कारखान्याने आत्तापर्यंत चांगला बाजारभाव दिला आहे. आत्तापर्यंत राहू बेट परिसरातून कमी प्रमाणात कारखान्याला ऊस जात होता. कारण या भागात कारखान्याने यंत्रणा लावली नव्हती. कार्यालय देखील नव्हते. परंतु आत्ता राहू बेटात दौंड शुगरचे कार्यालय झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस कारखान्याला जाऊ शकतो. त्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण होऊ शकते. बाजारभावात देखील दौंड शुगर हा बाजी मारू शकतो. त्यामुळे बाजारभाव व गाळपाबाबतीत बेट परिसरातून देखील ऊस उत्पादकांमध्ये दौंड शुगर ची चर्चा आहे.
बाजारभाव जाहीर करणे गरजेचे
पाठीमागील काळात कितीही आंदोलने होऊन राज्यात अनेक कारखान्यांनी आपला बाजारभाव जाहीर केला. परंतु दौंडमध्ये मात्र पूर्णपणे खात्रीचा बाजारभाव कधीच जाहीर करण्यात आला नाही. इतरांच्या बरोबरीने बाजारभाव देण्याचा प्रयत्न करू, असे वक्तव्य हे मोळी पूजनावेळी केले जात होते. एफआरपीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्याला भरडले जायचे. परंतु आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलली आहे. जोपर्यंत कारखाना समाधानकारक बाजारभाव जाहीर करीत नाही. तोपर्यंत ऊस तोडायला द्यायचा नाही, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
जास्त गाळप, बाजारभाव जास्त
दौंडमधील साखर कारखान्यात दौंड शुगर व भीमा- पाटस हे कारखाने पूर्ण क्षमतेने चालल्यास इतर कारखान्यांना उसाचा तुटवडा भासू शकतो. दौंड शुगर हा पुढील वर्षी सतरा हजार टनांच्या पुढे प्रतिदिन क्षमतेने चालू शकतो. आत्तापर्यंत दौंड शुगरने मोठ्या प्रमाणात गाळप केले आहे. बाजारभाव देखील दिला आहे. कारखान्यांना आर्थिक अडचण नसल्यामुळे हे कारखाने चांगला बाजारभाव देऊ शकतात.
आडसाली ऊस संपला
नव्वद टक्के ऊस हा गुऱ्हाळघरांनी गाळप केला आहे. यंदा बाजार चांगला मिळाल्यामुळे जवळजवळ नव्वद टक्के ऊस हा शेतकऱ्यांनी गुऱ्हाळाला दिला आहे. त्यामुळे ज्या आडसाली उसावर कारखान्याची भिस्त असते. तोच ऊस मोठ्या प्रमाणात संपल्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे.