नवी दिल्ली – युवकांनी संसदेची सुरक्षा भेदण्याचा केलेला प्रकार हा देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाईचाच थेट परिणाम आहे अशी प्रतिक्रीया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली आहे. आज ते येथे पत्रकारांशी बोलत होते. संसदेतील घटनेच्या संबंधात त्यांनी प्रथमच हे भाष्य केले आहे.
ते म्हणाले की, या युवकांनी संसदेची सुरक्षा का भेदली याचा विचार केला तर बेरोजगारी आणि प्रचंड वाढलेली महागाई हे यातील एक मुख्य कारण आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे देशातील युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे संसदेवर झालेला हल्ला हे याचेच थेट लक्षण मानले पाहिजे असे मला वाटते असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधी नेत्यांनी हाच मुद्दा गेले काही दिवस लावून धरला आहे. मात्र त्यावर राहुल गांधी अजून काहीच बोलले नव्हते. पण आज मात्र त्यांनी या घटनेमागे महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा हे प्रमुख कारण असल्याचे नमूद करीत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या तरूणांनी तानाशाही नही चलेगी सारख्या घोषणा प्रत्यक्ष आंदोलनाच्यावेळी दिल्या होत्या.
तसेच या प्रकरणात पकडण्यात आलेल्या एका महिलेने प्रसार माध्यमांशी बोलताना देश महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे, त्याबद्दल आम्हाला बोलू दिले जात नाही आमच्यावर दडपशाही केली जात आहे असा आरोप तिने केला होता. हाच मुद्दा राहुल गांधी यांनी उचलून धरला आहे.