नवी दिल्ली – प्रशांत किशोर यांनी कालच देशात पुन्हा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल असा दावा केला होता. पण त्यांचा हा दावा दुसरे एक निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी साफ फेटाळून लावला. भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असा छातीठोक दावा योगेंद्र यादव यांनी केला आहे. ते म्हणाले की माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय अभ्यासाच्या बळावर आपण हा दावा करतो आहोत. तत्पुर्वी प्रशांत किशोर यांनी भाजपला किमान ३०३ किंवा त्यापेक्षा किचींत जास्तच जागा मिळतील असे म्हटले होते.
प्रशांत किशोर हे प्रख्यात निवडणुक तज्ज्ञ आहेत. त्यांनीच भाजपच्या विजयाचे भाकित केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण योगेंद्र यादव यांच्या सारख्या दुसऱ्या एका प्रख्यात निवडणूक तज्ज्ञाने किशोर यांचा दावा फेटाळताना, भाजपच्या किमान ५० जागा कमी होत असून त्यांना वाढायला किंवा त्या भरून काढायला कोठेही संधी नाही असे म्हटले आहे.
त्यामुळे भाजपला २७२ हा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असे योगेंद्र यादव यांचे म्हणणे आहे. त्यांनी नमूद केले की प्रशांत किशोर यांनी राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही हे मान्य केले आहे. तसेच मेादींच्या प्रतिमेला तडे गेले आहेत असेही त्यांनी मान्य केले आहे, पण तरीही भाजपला ३०३ जागा कशाच्या आधारावर मिळणार आहेत असा सवाल यादव यांनी केला.
उलट बिहार सारख्या राज्यात भाजपला किमान पंधरा जागांचे नुकसान होत आहे. अन्य राज्यातही भाजपला काही प्रमाणात नुकसानच होताना दिसत असून त्यांना किमान ५० जागा कमी मिळत आहेत असेही योगेंद्र यादव यांचे म्हणणे आहे.त्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असे यादव यांनी नमूद केले आहे.