नागपूर : रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसह परिसराचा सर्वांगिण विकास करण्यात येणार असून राज्यातील महानुभाव पंथाच्या विविध तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राहुरी महानुभाव संस्थेच्यातर्फे महानुभाव संप्रदायामध्ये सेवाभावी काम करणाऱ्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या अमूल्य भाषिक योगदानामुळे रिद्धपूर मराठी साहित्याची गंगोत्री ठरली आहे. महानुभाव पंथ हा कुप्रथा, व्यसनाधिनतेपासून दूर आहे. पारस्पारिक संबंध जपून शुद्धतेची जपणूक करण्याचे काम महानुभाव पंथाने केले आहे. या पंथाचा विस्तार देशासह विदेशातही आहे. यामुळेच रिद्धपूर ही महानुभाव पंथाची सोबतच मराठी भाषेचीही काशी आहे. लीळाचरित्रासारखा आद्य ग्रंथ जेथे लिहिला गेला तेथे पहिले मराठी भाषा विद्यापीठ होणार आहे. चक्रधर स्वामी व त्यानंतरच्या गुरूंचा वैचारिक खजिना कालौघात नष्ट होऊ नये तर वाढावा, यासाठी या विद्यापीठाचे महत्त्व विशेष ठरणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महानुभाव पंथातील व्यक्तींना त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येते. यावेळी ‘श्रीनागदेवाचार्य जीवनगौरव कृतज्ञता पुरस्कार’ महंत दुतोंडे बाबा यांना तर महंत कारंजेकर बाबा यांना ‘आचार्यश्री गुर्जर शिवव्यास सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
खेळाडूंसाठीच्या ‘मिशन लक्ष्यवेध’साठी 160 कोटींचा निधी – क्रीडामंत्री बनसोडे
तसेच डॉ. विनोद पुसदेकर यांना ‘आचार्यश्री बाईदेवव्यास (भावेदवेव्यास) सेवा कृतज्ञता पुरस्कार’ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करुन शाल, श्रीफळ आणि गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.पुरस्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.