पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून नदीमध्ये 428 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच धरण काठोकाठ भरल्याने नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्यास नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पातील चार धरणांतून मिळून एकूण पाणीसाठा 64.52 टक्के म्हणजे 18.80 टीएमसी पाणीसाठा जमा आहे.
मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. मात्र, त्यानंतर दीड महिना पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पाऊस कधी पडतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले. पावसाने दडी मारल्याने खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यापार्श्वभूमीवर पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार होती. आता, धरण परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
खडकवासला धरण मागील आठवड्यात 90 टक्के भरल्याने धरणातून कालव्याद्वारे एक क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मागील दोन दिवसांपासून खडकवासला धरणात पाण्याचा येवा वाढल्याने बुधवारी धरण 100 टक्के भरल्याने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पानशेतमध्ये बुधवारी दिवसभरात 22 मिमी, खडकवासला धरणात 5 मिमी, वरसगावमध्ये 20 मिमी आणि टेमघर धरण परिसरात 25 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पानशेत धरण 71.62 टक्के भरले असून धरणात 7.62 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. वरसगाव धरण 58.58 टक्के, आणि टेमघर धरण 45.70 टक्के भरले आहे. मागील वर्षी याचवेळी चार धरणे100 टक्के भरली होती. तर धरणात एकूण 29.15 टीएमसी पाणीसाठा होता.