कोलकता – बंडाचे निशाण फडकावणारे राजस्थानमधील नेते सचिन पायलट यांनी घरवापसी केल्याचा आनंद आहे. त्यांच्यासारखे तरूण नेते कॉंग्रेसचे भविष्य आहेत, असे त्या पक्षाचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी बुधवारी म्हटले.
पायलट यांच्या बंडामुळे राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले होते. मात्र, पायलट यांचे कॉंग्रेसशी पॅच-अप झाल्याने त्या राज्यातील राजकीय पेच संपुष्टात आल्याचे चित्र आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या कॉंग्रेस नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर पायलट यांनी बंडाची तलवार म्यान केली.
त्यापार्श्वभूमीवर, अधिररंजन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पायलट स्वगृही परतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कुठल्याही पेचावर सलोख्याने तोडगा काढला जाऊ शकतो हेच संबंधित घडामोडीतून सिद्ध झाले, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
राजस्थानातील कोंडी फुटल्यामुळे पेचावर तोडगा काढू शकणारे नेते म्हणून राहुल यांची पक्षातील प्रतिमा उंचावली आहे का, असा प्रश्न अधिररंजन यांना विचारण्यात आला. त्यावर ते उत्तरले, राहुल यांना नेतृत्व क्षमता सिद्ध करण्याची कुठली गरज नाही.
कर्नाटकात 2018 मध्ये भाजपच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापन झाल्याने राहुल यांचे कौशल्य दिसून आले. अर्थात, काहींच्या विश्वासघातामुळे आम्हाला त्या राज्यातील सत्ता गमवावी लागली. राजस्थानचा पेच सोडवण्यात राहुल यांच्याबरोबरच प्रियांका यांनीही महत्वाची भूमिका निभावली, अशी प्रशंसा त्यांनी केली.
राजस्थानमधील घडामोडींचा आधार घेत अधिररंजन यांनी भाजपची खिल्ली उडवली. भाजपकडून केल्या जाणाऱ्या घोडेबाजाराच्या राजकारणाला राजस्थानमधील तोडग्याने हादरा बसला. भाजप आणि त्या पक्षाच्या खेळ्यांचा पराभव होऊ शकतो हे स्पष्ट झाले.
कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील या भीतीने भाजपने राजस्थानमधील आपल्या काही आमदारांना इतर राज्यात हलवले. ते पाहणे आनंददायी होते, अशी मिस्कील टिप्पणी त्यांनी केली.