मुंबई – उद्धव ठाकरेंच्या आजच्या कार्यक्रमाला पत्रकार परिषद म्हणावी की, दसरा मेळाव्याचे भाषण हे समजत नाही. माझ्याकडून जर काही राहिले किंवा चुकले असेल तर त्यावर बोलले जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, ही तर एक शिव्याशाप परिषद ठरली, अशी खोचक टिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेनंतर केली.
ते पुढे म्हणाले, या परिषदेत राज्यपालांना फालतू म्हणणे, सर्वोच्च न्यायालयाला काहीही बोलणे आणि निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द ठाकरेंनी वापरले. ज्या लोकांना संविधानिक संस्थांवर विश्वास नसेल तर त्यांचा संविधानावर कसा विश्वास असू शकतो असा प्रश्न मला पडतो, असेही ते म्हणाले. मी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला, असा त्यांचा आरोप आहे मात्र नेमका काय निर्णय घेतला हे मात्र त्यांनी सांगितले नाही, असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.
निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, पण लोकांमध्ये या संविधानिक पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीबद्दल गैरसमज पसरवला गेला तर ते योग्य नाही, म्हणून आपण हे स्पष्टीकरण देत आहोत असेही नार्वेकरांनी यावेळी म्हटले.
पक्ष चालवणे जबाबदारीचे काम
पक्ष, संघटना चालवणे हे जबाबदारीचे काम आहे. पक्ष, संघटनेची घटना केवळ कागदावर उतरवून ती कपाटात ठेवून द्यायची नसते. तर त्यावर अंमलबजावणी करायची असते. ठाकरे गट दाखवत असलेल्या पत्रात पक्ष घटनेचा उल्लेख नाही. १९९९ची पक्ष घटना आयोगाने माझ्याकडे पाठवली होती. २०१३ च्या पत्रात पक्ष घटनेचा उल्लेख नाही. आयोगाकडे असणाऱ्या पक्ष घटनेचा आधार घेण्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने सांगितल्यानुसारच आयोगाकडून पक्ष घटनेची प्रत मागवली गेली. शिवसेनेच्या घटनेत सुधारणा केल्याची प्रत असेल तर ती द्यावी, असेही मी मागितले होते.
न्यायालयानुसारच निकाल
मुळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर प्रतोद व अपात्रेवर निर्णय घ्यायचा होता. सुप्रीम कोर्टाने कोणाची निवड योग्य की अयोग्य, हे कधीच म्हटले नाही. मुळ राजकीय पक्ष ठरवून व्हीपला मान्यता देण्याचे कोर्टाने म्हटले होते. त्यांच्या गाईडलाईनुसारच मी कार्यवाही केली आहे. मुळ राजकीय पक्ष कोणता हे ठरविण्यास कोर्टानेच मला सांगितले होते, असेही नार्वेकरांनी यावेळी स्पष्ट केले.