मुंबई : आगामी विधानसभा निवडणुदरम्यान भाजपा २४० जागा लढवेन आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील अशा आशयाचं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेला संबोधित करताना म्हटले होते. त्यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी “हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने २०१४ मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर ४०-४५ जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं. “मुळात मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र तरी माहिती आहे का? त्यांना शेतकऱ्यांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्नतरी माहिती आहेत का? तर दुर्देवाने याचं उत्तर नाही असे आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ सुप्रीम कोर्टाच्या निकालाची काळजी आहे. निवडणूक आयोगाप्रमाणे हा निकाल सुद्धा विकत घेता येईल का? यावर त्यांचा विचार सुरू आहे. पण आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्राला न्याय मिळेल”, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाही, हा वादाच विषय आहे. कारण शेतकऱ्यांच्या मोर्चा आजही सुरू आहे. दुर्देवाने एका शेतकऱ्याचा काल मृत्यू झाला. याला सरकारचा बेकिरीपणा, निष्काळजीपणा कारणीभूत आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत. दोन फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमके होते. एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे, त्याचं प्रायश्चित तुम्ही केलं पाहिजे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.