उत्तराखंडमधील बाम्पाच्या जंगलात आज भीषण आग लागली आहे. चमोली जिल्ह्यातील नंदा देवी राष्ट्रीय उद्यानांतर्गत निती खोऱ्यातील बाम्पा जंगलात पेटलेल्या या वणव्यामुळे येथील सर्व जंगली जनावरे आपला जीव वाचविण्यासाठी वाट फुटेल तिथे पळत आहेत. काही वर्षांपूर्वीही उत्तराखंडमधील वणव्याने अनेकांची झोप उडविली. एक हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात लागलेल्या या वणव्यात जनावरांसह झाडे मोठ्या प्रमाणात जळाली. वनसंपदेचे खूप नुकसान झाले. वणवे कसे लागतात, यामागील कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊयात.
वणवे पेटतात कसे ?
– देशातील कोरड्या पानगळीच्या जंगलात चैत्रापर्यंत सर्वदूर पानांचा थर साचतो. गवतही वाळलेले असते. त्यात वातावरणातील कोरडेपण भर टाकते. काही तरी निमित्त घडते आणि वणवा लागतो. हे निमित्त नैसर्गिक असते, तसेच मानवनिर्मितही.
– नैसर्गिकरीत्या जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण केवळ 15 टक्के आहे, तर मानवनिर्मित आगीचे प्रमाण 85 टक्के आहे.
– साधारणत: मार्च हा सर्वाधिक वणव्यांचा महिना असतो. या महिन्यात एकूण वणव्यांच्या 46 ते 66 टक्के वणवे लागतात. हे प्रमाण एप्रिलमध्ये कमी होते. यंदाचे वर्ष मात्र त्यास अपवाद आहे
अनेकवेळा ही वणवे मानवनिर्मित असतात. यामागील कारणे अशी :
* ज्या जंगलात आदिवासी आहे आणि ज्याच्या बाजूला शेती आहे त्या ठिकाणी हमखास वणव्याची परिस्थिती तयार होते. वन्यजीव आणि आदिवासी हा एक संघर्ष, तर दुसरा संघर्ष वनखाते आणि आदिवासी असा आहे.
* जंगलमाफिया मुद्दाम आगी लावतात, असे म्हटले जाते. वणवा विझविल्यानंतर होरपळलेल्या झाडांचा लिलाव केला जातो. त्यातून माफियां मालामाल होतात. याशिवाय वणव्यानंतर मोकळी होणारी वनजमीन हाही एक आडफायदा असतोच.
* जंगलात फिरणारे गुराखी व इतर लोक विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक तसेच फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात. तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून आग लावली जाते. मोहफुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज गुराख्यांमध्ये आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात. जंगलालगत शेती असेल तर तेथेही सुपीक पिकांसाठी जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोहोचते आणि वणवा भडकतो.
दुर्दैव म्हणजे भारतातील एकाही राज्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी अद्ययावत यंत्रणा नाही. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते; पण आग लागू नये म्हणून पूर्वापार त्याच जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या याच पारंपरिक पद्धतीवर भारतीय वनखात्याची मदार आहे. वणवा लागू नये किंवा वणवा लागल्यानंतर पाहणी करण्यासाठी उंच मनोरे जंगलात तयार केले जातात, पण भारतातील किती जंगलांत ही उपलब्धता आहे याबाबत शंकाच आहे.