आजच्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज एनआरसी आणि सीएए विरोधात महाराष्ट्र बंद ठेवला होता. मात्र हा बंद माझ्यामुळे अपयशी ठरल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) सहभागी न झाल्यानेच बंद यशस्वी झाला नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज 24 जानेवारीला राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. मुंबई आणि सोलापूरमध्ये या बंद’ला हिंसक वळण लागले. या बंदमध्ये एकूण 35 संघटना सहभागी होणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी या वेळी केली आहे. केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याला विरोध करीत आंबेडकर यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका केली.
रामदास आठवले म्हणाले, आजचा बंद अनावश्यक होता. भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी होता. आजच्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 99.99 टक्के ठिकाणी बंद नाही, सर्व सुरु आहे. या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी नाही म्हणूनच प्रकाश आंबेडकरांचा बंद फेल ठरला.