इंदापूर, (प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे मार्केट कमिटी आवारामध्ये शुक्रवारी (दि. 5) दुपारी 3 वाजता भाजपचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय नेतृत्वाबरोबर माझी चर्चा झाली आहे, या चर्चेसाठी त्यांनी दिल्लीला मला बोलावून घेतले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 3 वेळा बैठकी झाल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई मध्ये सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार व माझीच सुमारे दोन ते अडीच तास सविस्तर बैठक झाली. सन 2004, 2009, 2014, 2019 या 4 लोकसभा निवडणुकीत आमच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी निष्ठेने त्यावेळी काम केले; मात्र त्यानंतर अवघ्या चार-पाच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 4 ही वेळा आमच्या विरोधात भूमिका घेण्यात आली.
त्यामुळे पाठीमागील 4 वेळेचा अनुभव लक्षात घेता भाजप कार्यकर्ता हा आता पाचव्यांदा काम करेल, हे सांगता येत नाही. अगदी मनातील सर्व विचार मुद्दे त्यांच्यापुढे मांडले. त्यांना या सर्वच गोष्टी माहीती नव्हत्या. त्यामुळे त्यांनी इंदापूरचे पालकत्व मी घेतो, इंदापूरची जबाबदारी मी घेणार असे मुंबईला गेलेल्या निवडक भाजप कार्यकर्त्यांना सांगितले.
मुंबईला निवडक कार्यकर्ते आल्यामुळे मी इंदापूर तालुक्यात येऊन तेथील सर्व भाजप कार्यकर्त्यांची मी संवाद साधतो, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने ते उद्या इंदापूरला भाजपच्या मेळाव्यासाठी येत आहेत. या पत्रकार परिषदेस भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार, पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव थोरात, भाजपचे युवकचे तालुकाध्यक्ष तुषार खराडे उपस्थित होते.
गावोगावच्या भाजप कार्यकर्त्यांचे समाधान महत्वाचे
माझ्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे भाजप नेता म्हणून माझी जबाबदारी आहे की, इंदापूर तालुक्यातील गावोगावच्या भाजप कार्यकर्त्यांचे बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात व इतर मुद्द्यांवर समाधान झाले पाहिजे, त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.