औंध, -चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा केंद्रावर दररोज जवळपास 280 ते 300 टॅंकर दररोज भरून जातात. प्रामुख्याने बाणेर, बालेवाडी व समाविष्ट गावे म्हाळुंगे, सूस या परिसराकडे जाणारे हे टॅंकर आहेत. प्रामुख्याने टॅंकरच्या निविदा निघाल्यामुळे पाणीपुरवठा कमी करून टॅंकरच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत, टॅंकर भरण्यासाठी पाणी आहे, नळाला सोडण्यासाठी नाही का? असा सवाल करीत माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली चतुर्श्रुंगी पाणीपुरवठा केंद्रावर औंध मधील नागरिकांनी टॅंकर बंद आंदोलन केले.
औंध, बाणेर परिसरात नळाद्वारे पाणीपुरवठा कमी करून टॅंकर ठेकेदारांचा व्यवसाय तेजीत होण्यासाठी पाणीपुरवठ्याचा तुटवडा निर्माण केला जात आहे, असा आरोप करीत या निषेधार्थ चतुःशृंगी पाणीपुरवठा केंद्र येथे औंधमधील नागरिकांनी टॅंकर बंद आंदोलन केले. चतुःशृंगी पाणीपुरवठा केंद्रावर औंध, बाणेर, बोपोडी व इतर भागांत पाणीपुरवठा टॅंकरद्वारे सुरू केलेल्या दिवसापासून सर्वत्र पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात आला आहे. यामागे केवळ टॅंकरचालकाचा व्यवसाय व्हावा, हा उद्देश समोर आल्याने या ठिकाणी टॅंकर बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी मोकळे हांडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
व्हॉल्वमनच्या माध्यमातून काही ठिकाणी कमी प्रमाणात पाणी सोडले जाते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून औंधमधील सोसायटीतील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे, एक महिन्यांपासून ही समस्या अत्यंत गंभीर होऊन काही ठिकाणी थेंबभरही पाणी येत नाही. तर याबाबत चतुःशृंगी पाणीपुरवठा केंद्रावर पाण्याची कुठलीही कमतरता नाही, तरीही नागरिकांचे पाणी कमी का केले जाते. हे सर्व ठेकेदारांचे टॅंकर चालविण्यासाठी केलेली उठाठेव असल्याचा, आरोप माजी नगरसेविका अर्चना मुसळे आणि ऍड. मधुकर मुसळे यांनी केला आहे.
सिद्धार्थ नगर, अभिमानश्री सोसायटी, भवानी पार्क, गुलमोहर पार्क, क्लारिओन पार्क, लक्ष्मी रेसिडेन्सी आदी सोसायट्यांतील नागरिक यावेळी उपस्थित होते. अधीक्षक अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रसन्न जोशी यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पुढील आठ दिवसांमध्ये सोसायट्यांमधील पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.