फुरसुंगी – निसर्ग सौंदर्याच्या खाणीत, डोंगर दऱ्याच्या कुशीत, दिवेघाटाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पेशवेकालीन मस्तानी तलावाची प्रशासन व पुरातत्त्व खात्याच्या उदासीनवृत्तीमुळे दुरवस्था झाली आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा हवेत विरल्याने हा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तलावात पाणीच नसल्याने मोठ्या उत्सुकतेने तलाव पाहण्यासाठी येणारे पर्यटक, इतिहासप्रेमी व नागरीकांची निराशा होत आहे.
फुरसुंगी, दि. 28 (प्रतिनिधी) – निसर्ग सौंदर्याच्या खाणीत, डोंगर दऱ्याच्या कुशीत, दिवेघाटाच्या पायथ्याशी वसलेल्या ऐतिहासिक पेशवेकालीन मस्तानी तलावाची प्रशासन व पुरातत्त्व खात्याच्या उदासीनवृत्तीमुळे दुरवस्था झाली आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा हवेत विरल्याने हा ऐतिहासिक वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तलावात पाणीच नसल्याने मोठ्या उत्सुकतेने तलाव पाहण्यासाठी येणारे पर्यटक, इतिहासप्रेमी व नागरीकांची निराशा होत आहे.
भिंती, तटबंदीची पडझड
मस्तानी तलाव पुरातत्व खाते व प्रशासनाच्या उदासीन वृत्तीमुळे पाण्याअभावी व देखभाली अभावी पडझड होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पुरातन दगडी बांधकाम करून चोहोबाजुंनी चिरेबंदी असलेल्या या तलावाच्या संरक्षक भिंती जागोजागी ढासळत आहेत. सर्वत्र झाडझुडपे वाढल्याने तटबंदीही ढासळत आहेत. यातून डोंगरावरील दगड गोटे, माती थेट तलावात पडत असल्याने तलावाच्या पात्रात भर पडत आहे.
पर्यटन स्थळ म्हणून विकास नाहीच
मस्तानी तलावाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या राज्यकर्त्यांनी अनेक घोषणा केल्या, प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही झालीच नाही. हा तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित केल्यास येथे बोटिंग, हॉटेल, त्याअनुशंघाने अनेक पुरक व्यवसाय सुरू होऊन या भागाचा विकास होऊ शकतो. हा ऐतिहासिक वारसा कायमचा जतन होण्यास यातून महसूलही उपलब्ध होऊ शकतो.