लंडन -इंग्लंडच्या परिस्थितीत फलंदाज म्हणून मला कधीच आरामदायी वाटत नाही, पण विरोधी गोलंदाजीवर कधी हल्ला करायचा याचा अंदाज मी बांधला आहे. मात्र, कसोटी विजेतेपद काहीही करून मिळवायचे असेल तर इंग्लिश खेळपट्ट्यांवर कठोर परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही.
अशातच ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ समोर असेल, तर छोटीशी चूकही महागात पडू शकते, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे.
भारताबाहेर रोहित शर्माचे एकमेव कसोटी शतक 2021 मध्ये ओव्हल येथे झाले होते. रोहितला वाटते की जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून त्याने सतत 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या काळात सर्वोत्तम सरासरी असलेला तो भारतीय एकमेव फलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या “हाय व्होल्टेज’ लढतीपूर्वी रोहित म्हणाला, “मला वाटते की इंग्लंडमधील परिस्थिती फलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. जर तुम्ही तयारी केली, लक्ष केंद्रित केले तर अवश्य यश मिळू शकते. 2021 मध्ये मला एक गोष्ट जाणवली की तुम्ही मैदानावर टिकून राहणे सर्वाधिक महत्त्वाचे असते.
ओव्हलमध्ये लवकर कधीही सेट होता येत नाही आणि तेथे हवामान सतत बदलत असते. तुम्हाला जास्त तास लक्ष केंद्रित करावे लागते मग कोणत्या गोलंदाजावर कधी हल्ला करायचा हे तुम्हाला समजू शकेल. तुमची ताकद काय आहे, हे समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
मी ओव्हलमधील यशस्वी खेळाडूंचे अनुकरण करणार नाही पण स्कोअरिंग पॅटर्न जाणून घेईन. ओव्हलमध्ये विकेटच्या दोन्ही बाजूने शॉट्स खेळल्याने चेंडू वेगाने सीमारेषेकडे जातो.