नवी दिल्ली – भाजपकडून राजकारणात सर्वसंमतीला महत्व दिले जाते. पक्षात राजकीय अस्पृश्यतेला थारा नाही. त्यामुळेच आमच्या सरकारने राजकीय प्रतिस्पर्ध्यांचाही नागरी सन्मानांनी उचित गौरव केला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले.
पं.दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी यांनी भाजप खासदारांना उद्देशून भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले, भाजपने नेहमीच राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला श्रेष्ठ मानले. त्यातून पक्ष राजकीय प्रतिस्पर्ध्यांचाही आदर करत आला आहे.
सरकार जरी बहुमताच्या जोरावर चालत असले, तरी देश सर्वसंमतीच्या बळावर चालतो अशी भूमिका मी पंतप्रधान बनल्यानंतर संसदेत सर्वप्रथम बोलताना मांडली होती. आम्हाला केवळ सरकार चालवायचे नाही; तर देशाला पुढे न्यायचे आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला नव्हे; तर कार्यकर्त्यांना महत्व दिले जाते.
त्यामुळेच अधिकाधिक लोक पक्षाच्या पाठिशी उभे राहत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारांनी अनेक महत्वाची पाऊले उचलली. त्याचा अभिमान भाजपचे कार्यकर्ते, नेत्यांबरोबरच भावी पिढ्यांनाही वाटत राहील. राजकीयदृष्ट्या अवघड वाटणारे निर्णयही आम्ही देशहितासाठी घेतले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.