पुणे – देशात सध्या भेदाचे वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांनी सामान्यांचा विश्वास हिरावून घेण्यात आला आहे, असे परखड भाष्य माजी साहित्य संमेलनाध्यक्षा आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी बुधवारी (दि. 8) व्यक्त केले.
पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी पोलीस आयुक्तालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर डॉ. ढेरे यांनी देशातील सद्य:स्थितीवर परखड भाष्य केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो. त्यावेळी आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे.
देशात सध्या भेदाचे वातावरण आहे. सर्वांनी एकत्र येऊन विचार करायला हवा. सामान्यांच्या विश्वास सर्वच सत्ताधाऱ्यांनी हिरावून घेतला आहे. आपण निवडून दिलेल्या माणसांकडून देश, धर्म, प्रांत याबाबत भेदाचे राजकारण केले जाते. हे सर्व खेळ आपण अलिप्तपणे पाहतो. सामान्यांप्रमाणे साहित्यिकांना देखील एक प्रकारची हतबलता आली आहे.
सध्या सगळ्या पातळीवर भेदाचे राजकारण केले जात आहे. साहित्यिकांमध्ये छुपे वाद, दुही तसेच वाङ्मयामध्ये गोष्टी आहेत. प्रत्येक क्षेत्रात जातीभेदाचे राजकारण आहे. जेव्हा कोणावर भरोसा ठेवासा वाटतो, तेव्हा असंगाशी युती झालेली असते. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो किंवा समाजाला दिशा देण्याचे काम करू शकतो, असे वातावरण सध्या नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुणाई एकत्र आलेली आहे. अशा परिस्थितीत तरुणाईला विधायक दिशा देण्यासाठी नेतृत्व उभे राहायला हवे, असे त्यांनी नमूद केले.