मुंबई : करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सोनू सूदने केलेल्या मदत कार्याचा देशभर गवगवा झाला. त्यातून सोनू सूदला ‘मसीहा’ ही पदवी आपसूकच बहाल झाली. मात्र, आता त्याच सोनू सदवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या सोनू प्रकरणावरून शिवसेनेने राज्यात विरोधी आणि केंद्रात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.
“विध्वंसक, चुकीच्या माणसांना हाती धरायचे, त्यांना आर्थिक आणि दिल्लीच्या सत्तेचे पाठबळ द्यायचे आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर घाणेरडे आरोप करायचये. त्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी मग तपास यंत्रणा तयारच आहेत”, अशा शब्दांत शिवसेनेने टीका केली आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आले आहे.
भाजपाकडून आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांना आणि व्यक्तींना टार्गेट केले जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. “भाजपा हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यांतील सरकारे किंवा वेगळ्या विचारांचे लोक यांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठएपण आहे.
महाराष्ट्रातल्या मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे. हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही”, असे या अग्रलेखात नमूद केले आहे.
दरम्यान, भाजपाच्या काही पुढाऱ्यांना वरच्यांचं पाठबळ असल्याशिवाय ते ईडीच्या कार्यालयात इतक्या बिनधास्तपणे जाऊ शकत नाहीत, असे देखील अग्रलेखात म्हटलं आहे. “जे भाजपाशी संबंधित नाहीत, अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करणे हे धोरण ठरलं आहे. त्यातून राज्यातील मंत्री सुटले नाहीत तसे सोनू सूदसारखे कलाकार आणि सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत. भाजपाचे काही चवचाल पुढारी हे स्वत:च्या बाथरूममध्ये घुसावेत, तसे रोज ईडीच्या कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत. इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळासशिवाय येणं शक्यच नाही”, अशी टीका करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्लीतील आपचं सरकार, पंजाब यांच्या सरकारसोबत सामाजिक कार्य म्हणून सोनू सूद सहभागी होताच त्याला लक्ष्य करण्यात आल्याचं या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. “सोनू महाशयांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत.
सोनू करत असलेल्या सामाजिक कार्यामागे फक्त भाजपाचीच प्रेरणा असल्याचे ठासून सांगितले जात होते. पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळवण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असं ठरवण्यात आलं”, अशी टीका शिवसेनेने केली आहे.