नवी दिल्ली: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोदी सरकारने रोख रकमेची मदत द्यावी. तसे केले नाही तर गरीब लोक उद्ध्वस्त होतील. मध्यमवर्गीयांचा समावेश नव्या गरिबांमध्ये होईल आणि सरकारच्या जवळचे भांडवलदार देशाचे मालक बनतील, असा इशारा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला.
करोना फैलाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्या पाऊलामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली. आता अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी गरिबांच्या हाती थेट रोख रक्कम देण्याची आणि लहान उद्योगांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी कॉंग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. त्याचा पुनरूच्चार राहुल यांनी शनिवारी केला.
प्रत्येक गरीब कुटुंबाला तातडीने 10 हजार रुपयांची मदत करावी. त्या कुटुंबांना पुढील सहा महिने दरमहा 7 हजार 500 रूपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली. लॉकडाऊनच्या विविध टप्प्यांत करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यावरूनही राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
पुन्हा-पुन्हा एकच वेडेपणा केला जात आहे आणि वेगवेगळ्या परिणामांची अपेक्षा केली जात आहे, असे त्यांनी म्हटले. लॉकडाऊनचा उद्देश यशस्वी ठरलेला नाही. वेगळ्या पाऊलांचा विचारही होणे गरजेचे होते, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे.