नवी दिल्ली – ओला उबेर सारख्या कॅब अग्रीगेटर कंपन्यांनी ग्राहकाबरोबर नियमाप्रमाणे व्यवहार करावा. त्यांच्या संदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. या कंपन्यांनी अयोग्य व्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
यासंदर्भात आज एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, बुकिंग स्वीकारल्यानंतर चालक ग्राहकांना बुकिंग कॅन्सल करायला सांगतात. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त शुल्क लागते. अशा जास्त तक्रारी आल्या आहेत. या संदर्भातील आकडेवारी आम्ही या कंपन्यांना दिली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची यंत्रणा या कंपन्यांनी विकसित करण्याची गरज आहे.
जागो ग्राहक जागो हेल्पलाइनवर असंख्य तक्रारी आल्या आहेत. अनेक ग्राहक तक्रार करीत नाहीत. त्यामुळे या क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की या संदर्भात आम्ही एक मार्गदर्शक प्रणाली या कंपन्यांना जारी करणार आहोत.
या बैठकीला ओला, उबेर, मेरू, जुगनू इत्यादी कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. अनेकदा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना एका प्रवाशाला वेगळे भाडे आकारले जाते तर दुसऱ्या प्रवासाला वेगळे भाडे आकारले जाते. याबाबत स्पष्टीकरण या कंपन्यांकडे मागण्यात आले आहे. याचा अर्थ जुन्या ग्राहकांना जास्त आकार लावला जातो तर नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना कमी आकार लावला जातो. मात्र हे व्यावहारिक दृष्टया योग्य नाही असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आगामी काळातही पाठपुरावा केला जाणार आहे.