Manoj Jarange patil – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याशेजारी बसून उपोषण करावे.
मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो, असे ते म्हणाले. दुसरीकडे, हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी फडणवीस यांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू न देण्याचा निर्धारही व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी एकाच दिवशी ५ ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, माझे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान आहे.
त्यांनी हिंमत असेल तर ८ दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते. वजन कमी करायचे असेल तर या आणि माझ्यासोबत उपोषणाला बसा, असा टोलाही लगाविला.
त्यांनी माझ्यावर आई-बहिणीविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्यांना २ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी लागलेली मुलगी आई-बहीण वाटली नाही का? त्यांनी त्यांना वाटेल ते करावे, मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
आमच्या आया-बहिणींना आजही नीट चालता येत नाही. कारण, लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे. तेव्हा तुम्हाला आमच्या माता-भगिनी दिसल्या नाही का?
तुम्ही लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर केवळ १० दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्याचवेळी आम्हाला तुमची मराठ्यांविषयीची नियत दिसली, असे मनोज जरांगे म्हणाले.
शिंदेंची मराठा समाजात इज्जत होती
मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. माझी व देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली असताना एकनाथ शिंदे उगीचच मध्ये पडले. माझे मनोज जरांगेंशी कोणतेही देणेघेणे नाही. मी अशांचा करेक्ट कार्यक्रम करतो असे ते म्हणाले.
पण आता मराठा समाजच आता असे बोलणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. शिंदेंची मराठा समाजात इज्जत होती. पण त्यांनी समाजाला काय दिले? असा सवाल त्यांनी केला.