यवतमाळ – भारतीय जनता पक्षाने सन 2019 पुर्वी युतीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे पालन केले असते तर आज त्यांना अन्य पक्षांना पायघड्या घालण्याची वेळच आली नसती, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना युतीत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घ्यायचे ठरले होते. तशी मान्यता खुद्द अमित शहा यांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी दिली होती. आता अजित पवार यांचा गट भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या युतीत सध्या जो गोंधळ उडालेला आहे ती परिस्थिती भाजप आता कशी हाताळणार याची आम्ही वाट पाहत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची तडजोड मान्य केली असती तर आज ती पुर्ण झाली असती आणि भाजपच्या लोकांना अन्य पक्षांना पायघड्या घालण्याची वेळ आली नसती. आता भाजपने अन्य पक्षांवर टीका करणे थांबवून त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांची काळजी वाहवी. त्यांनी आता आम्हाला राजकारण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आपला हा दौरा आहे. तसेच या दौऱ्यात येथील शेतकऱ्यांचे आणि नागरीकांचे प्रश्नही ऐकून घेणार असून त्या विषयी विधीमंडळातही आवाज उठवला जाईल, असे त्यांनी नमूद केले. या दौऱ्यात विदर्भातल्या सर्व जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत.
आम्हाला सुप्रीम कोर्टाची दारे खुली
विधानसभेच्या अध्यक्षांनी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या संबंधात बजावलेल्या नोटीसांच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, या संबंधात सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत. अध्यक्षांना त्या चौकटीतच निर्णय घ्यावा लागणार आहे. त्या बाहेर जाऊन निर्णय घेतला गेल्यास आम्हाला सर्वोच्च न्यायालयाची दारे खुली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.