यवतमाळ – गर्दी पाहून निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील आणि जर उघडले नसतील तर त्यांनी ते डोळे तसेच बंद करावे कारण आता जनतेचे डोळे उघडले आहेत. अशी टीका उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर केली. ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. पोहरादेवीच्या दर्शनानंतर दिग्रस येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.
राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार आहे. आमचा पक्ष फोडला तुम्ही सरकार स्थापन केलं एवढं मजबूत सरकार तुमचं होत मग राष्ट्रवादी चोरण्याची गरज काय होती ? असा सवाल देखील यावेळी ठाकरेंनी उपस्थित केला. अमित शहांनी दिलेलं वचन पाळलं असत तर आज तुमचा देखील मुख्यमंत्री असता अशी आठवण देखील उद्धव ठाकरेंनी भाजपला यावेळी करून दिली.
समान नागरी कायद्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले,”एक देश एक कायदा ठीक आहे परंतु एक देश एक पक्ष कदापि होऊ शकत नाही” असा टोला देखील ठाकरेंनी यावेळी भाजपला लगावला. भाजपला ठाकरे नकोत फक्त शिवसेना हवी. मणिपूर शांत करायचं आहे, मी तोडगा देतो. जसे तुम्ही ईडी,इनकम टॅक्स जशी इकडे एखाद्याच्या घरी पाठवता तशी ही यंत्रणा मणिपूरमध्ये पण पाठवा असं ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.
आमदार खासदार गेले तरी चालतील कारण दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहे. तुम्ही कोणासोबत गेला तरी चालत मात्र शिवसेनेने कुठे जायचे नाही असं तुम्हाला वाटत हे बेगडी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आधी मतपेटीतुन सरकार जन्माला यायचं आता खोक्यातून येत असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपला गरिबांचा घर उभं करण्यामध्ये नाही तर फोडण्यामध्ये रस आहे अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली.