भोर – दिल्लीमध्ये एप्रिलच्या पाच-सहा तारखेला कॉंग्रेसच्या नव्या-जुन्या आमदारांसाठी पक्षातर्फे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील काही आमदारांनी एका पत्राद्वारे पक्षाध्यक्षांकडे भेटीची वेळ मागितली असून, हे पत्र भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या लेटरहेडवर असल्याने राज्यातील “नाराज’ आमदार पक्षाध्यक्षांच्या भेटीला, या चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत चर्चा अशी आहे की, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून या पदासाठीची निवडणूक रखडलेली आहे. या पदासाठी भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव सातत्याने पुढे आहे; पण निवडणूकच होत नाही. आश्वासनानंतरही अजून भोरला लाल दिव्याची गाडी मिळालेली नाही. अशा विविध कारणांमुळे आमदार थोपटे यांच्यासह कॉंग्रेसमधील 20 आमदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.
याबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी पक्षाध्यक्षांच्या भेटीची वेळ आमदार थोपटे यांनी मागितली असल्याबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसला न्याय मिळत नसल्याचे अनेक दिवसांपासून बोलले जात आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीच्या वेळेची मागणी आमदारांनी केली असल्याने आणि तीही संग्राम थोपटे यांच्या “लेटरहेड’वर असल्याने नाराज आमदारांचा विषय ऐरणीवर आला आहे. हे पत्र 22 मार्चचे आहे. राज्यात सध्या कॉंग्रेसचे 43 आमदार असून त्यापैकी 28 आमदारांची नावे पत्रातील यादीत आहेत, यापैकी 20 जणांनीच पत्रावर सह्या केल्या आहेत. त्यामुळे आमदार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सह्या असलेले प्रमुख आमदार
राज्यातील आमदारांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदरचे आमदार संजय जगताप, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, विक्रमसिंह सावंत, राजू आवळे, प्रतिभा धानोरकर, अमित झनक आदी आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत, तर मंत्री विजय वडेट्टीवार यांचेही पत्रातील यादीत आहे; पण त्यांनी सही केलेली नाही. याबरोबरच सुरेश वडपूरकर, जितेश अंतापूरकर, सुभाष धोटे, धीरज देशमुख, राजेश एडके यांनीही सह्या केलेल्या नाहीत.