लंडन – अति लोकसंख्या हा जागतिक पातळीवरील एक अतिशय चिंतेचा विषय आहे. विशेषता भारत-चीन या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशांसाठी लोकसंख्या हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. पण आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे 2100 पर्यंत जागतिक लोकसंख्यामध्ये प्रचंड प्रमाणात घट होणार असून हे शतक संपत असताना लोकसंख्या नियंत्रणात राहणार असल्याचे चित्र दिसणार आहे. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाने याबाबतचा लेख प्रसिद्ध केला असून 2100 साल उजाडेपर्यंत जागतिक लोकसंख्या नियंत्रणात राहील असे म्हटले आहे.
या लेखातील माहिती प्रमाणे 2064 पर्यंत जागतिक लोकसंख्या सर्वोच्च स्थानावर पोहोचणार आहे. त्यानंतर मात्र लोकसंख्या घट व्हायला प्रारंभ होणार आहे. 2100 पर्यंत चीनची लोकसंख्या निम्म्याने घट होणार असून भारताच्या लोकसंख्येचे प्रमाणही तब्बल 29 कोटीने घटणार आहे.
2064 पर्यंत जागतिक लोकसंख्या 970 अब्ज एवढी असेल पण 2100 सालापर्यंत हीच लोकसंख्या 879 अब्जापर्यंत कमी झालेली दिसेल. वाढते शहरीकरण महिलांचे शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण साधनांचा वाढता वापर यामुळे 2064 नंतर लोकसंख्या घटण्यास प्रारंभ होईल असे या लेखामध्ये म्हटले आहे.
काही जागतिक संघटनांनी केलेल्या अभ्यासाप्रमाणे 2100 साल उजाडेपर्यंत जगाची लोकसंख्या अकराशे अब्ज असेल पण हा दावा या लेखाने खोडून काढला असून 2064 नंतर लोकसंख्या घटण्यास प्रारंभ होईल आणि 2100 साल उजाडेपर्यंत जगाची लोकसंख्या 879 अब्जपर्यंत सीमित राहील.
या लेखातील माहितीप्रमाणे युरोप आशिया आणि अमेरिकेमध्ये जरी लोकसंख्या घटण्यास प्रारंभ होणार असला तरी आफ्रिकेमधील काही प्रदेशांमध्ये मात्र लोकसंख्या वाढणार आहे अर्थात लोकसंख्या वाढीचा वेग कमी असणार आहे.