पारनेर – तालुक्यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारात काल (सोमवार) सायंकाळी 6 वाजता वायरमनचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील वाडेगव्हाण बेलवंडी फाटा शिवारात अवकाळी वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती. त्यामुळे महावितरणने वीज दुरुस्तीसाठी वायरमन पाठवला. दरम्यान, वीज दुरुस्ती करत असताना वायरमन भरत कोल्हे यांचा विजेच्या खांबाला चिकटून मृत्यू झाला. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या वेळी कोल्हे यांचा मृतदेह सुमारे अर्धा तास खांबावर लटकून होता.
वाडेगव्हाण शिवारातील शेळके यांच्या शेतातील वीज पोलवर महावितरणचे वायरमन भरत कोल्हे काम करत असताना त्या पोलवर रिंग सर्किट असल्याने अचानक वीजपुरवठा सुरू झाला. त्यामुळे कोल्हे यांना जोराचा विजेचा झटका बसला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने कोल्हे यांचा मृतदेह खाली घेतला. मृतदेह पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आज (मंगळवार) दुपारी 12 वाजता त्यांच्यावर सुपा येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महावितरण सुपा उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता श्रेयश रूद्राकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.