बालासोर – ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील 278 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यापैकी जवळपास 40 जणांचा मृत्यू हा विजेच्या धक्क्यामुळे झाला असल्याचे म्हटले जात आहे. हे प्रवासी कोरोमंडलमधून प्रवास करत होते.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या सुमारे 40 मृतदेहांवर जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत. त्यांचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत बालासोर येथील रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
Odisha Train Accident : कॉंग्रेसचा ‘तो’ दावा IRCTC ने फेटाळला
दरम्यान, ओडिशा रेल्वे अपघातानंतर कॉंग्रेसकडून सरकारवर टीका केली जाते आहे. पक्षाकडून सरकारला काही प्रश्नही विचारण्यात आले. त्यानंतर एका कॉंग्रेस नेत्याने असा दावा केला की या दुर्घटनेनंतर अनेक प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले आहे. लोक रेल्वेने प्रवास करायला घाबरत आहेत. मात्र त्यांचा हा दावा आयआरसीटीसीने फेटाळला आहे.
हजारो लोकांनी आपले तिकिट रद्द केले आहे. गेल्या बऱ्याच काळात इतकी भीषण दुर्घटना घडली नव्हती असे म्हणत कॉंग्रेस नेते भक्तचरण दास यांनी व्हिडिओ ट्वीट केला आहे. रेल्वेचा प्रवास आता सुरक्षित राहीला नसल्याची लोकांची भावना झाली असल्याचेही ते म्हणाले.
तथापि, रेल्वे तिकिट बुकींगचे काम पाहणाऱ्या आयआरसीटीसीने मात्र हे दावे फेटाळत आकडेवारीच सादर केली आहे. 1 जून 2023 रोजी म्हणजे अपघाताच्या एक दिवस अगोदर तिकीट रद्द करण्याचे प्रमाण 7.7 लाख होते. तर 3 जून 2023 रोजी म्हणजे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिकिट रद्द होण्याचे प्रमाण 7. 5 लाख होते असे त्यांनी नमूद केले आहे.