राजगुरूनगर : खेड तालुका भाजपच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्याने चास कमान धरणातून पाणी उपसा करून राजगुरूनगर शहराला पाणीपुरवठा करणारी नवी योजना 31 जुलैपर्यंत कार्यान्वित होईल, अशी माहिती भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश सांडभोर, मनोहर सांडभोर, राहुल आढारी, अमर बोराडे, शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. अतुल देशमुख म्हणाले की, राजगुरूनगर नगरपरिषदेत भाजपची सत्ता होती त्या काळात पाणी योजना आणि गटार योजना मंजूर झाल्या. दोन्ही योजना पूर्णत्वाकडे आहेत; मात्र 16 मार्च 2000 मध्ये नगरपरिषदेचा कार्यकाळ संपला आणि नगरपरिषदेवर प्रशासक आला. दरम्यानच्या काळात भाजपकडून या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र राज्यात आघाडीची सत्ता असल्याने या योजनेत राजकारण झाले. त्यामुळे अनेक अडचणी आल्या.
वास्तविक आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी या योजना मार्गी लावणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यांची राजगुरुनगर शहरामध्ये पाणी आणि गटार योजना मार्गी लावण्यासाठी इच्छाशक्ती नव्हती त्यामुळे या दोन्ही योजना रखडल्या. आघाडीचे सरकार गेल्यानंतर पुन्हा फडणवीस- शिंदे सरकार स्थापन झाले. त्यानंतर मात्र आम्ही राजगुरुनगर शहरातील पाणी योजनेचे पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. पाणी योजना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या एक्प्रेस फिडरसाठी प्रयत्न केले.
सुरुवातील 1 कोटी 63 लाखाचे टेंडर झाले; मात्र यात कालावधी गेल्याने पुन्हा चार ते पाच वेळा टेंडर रिकॉल झाले या कामासाठी कोटी 20 लाखांचा निधी मंजूर झाला एक्प्रेस फोडाराचे काम जलदगतीने सुरू झाले आहे हे काम पूर्ण होताच राजगुरुनगर शहराला शुद्ध स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.
राजगुरूनगर शहराला चास कमान धरणाततून पाणीपुरवठा करणारी योजना गेली काही वर्षांपासून रखडली होती. चास कमान धरणातून पाणी उपसा करण्यासाठी विजेची कमतरता होती त्यासाठी एक्सप्रेस फिडरची गरज होती त्यासाठी चार ते पाच वेळा टेंडर रिकॉल झाले होते यात मोठा कालावधी गेला. त्यामुळे या योजनेच्या पाण्यापासून सुमारे 6 ते 7 वर्षे राजगुरूनगर शहरातील नागरिक वंचित राहिले आहेत.
आता आमदारांनी श्रेय घेऊ नये
राजगुरुनगर शहराचा पूल बांधुन विकास होत नाही तर शहरातील नागरिकांचे वीज, पाणी, आरोग्य, कचरा हे प्रश्न सोडल्यानंतर विकास होत असतो. त्यासाठी लोकप्रतिनिधीची मानसिकता आवश्यक आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शहरातील पाणी आणि गटार योजना पूर्ण करण्यासाठी सोयीस्कर दुर्लक्ष केले. सलग 4 वर्षे ते संकुचित वृत्तीने कामकरीत आहेत. या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष दिले नाही आघाडी सरकार असताना शहरातील या दोन्ही योजना आतापर्यंत पूर्ण करता आल्या नाहीत. या योजना पूर्ण होणे गरजेचे होते. आमदार म्हणून असलेल्या जबाबदारी ते पूर्ण करू शकले नाहीत. आता त्यांनी या योजनाचे श्रेय घेऊ नये. आम्ही श्रेय घेण्यासाठी नाही तर जनतेचे प्रश्न सोडिवण्यासाठी काम करत आहोत. शहरातील गटार योजनेतील अडचणी दूर करून तीही योजना मार्गी लावू, शहरातील अंतर्गत रस्ते अपूर्ण कामे पूर्ण केली जातील, असे अतुल देशमुख यांनी नमूद केले.