गावी गेलो होतो. बाजरीची मळणी करायची होती. कणसं खुडून झाली होती. दोन डेपो लावले होते. मशीन येणार होतं. झालेली बाजरी भरून ठेवण्यासाठी गोण्या तयार होत्या. बाजरी झाली. पोत्यात भरली. पोत्यांची तोंडं लावली. गडी म्हणाला, “मालक पुण्याला घेऊन जावा की दोन चार पोती.’ पण आता पुण्या-मुंबईत बाजरी कोण खातो? सगळेच गव्हावर पोसले जाताहेत. दिवाळीत वासू बारसं साजरी करण्यासाठी आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला काही घरात बाजरीची भाकरी होत असेल तेवढीच. त्यासाठी किती बाजरी लागायची? फार तर किलो अथवा दोन किलो. त्यामुळे आम्हा चार भावंडांसाठी अंदाजे साठ पासष्ट किलोची एक गोणी मी गाडीत टाकली. “तुझ्यासाठी हवी तेवढी ठेवून घे. आणि बाकीची मार्केटला पाठवून दे,’ असं गड्याला सांगितलं. शेतावर चौफेर नजर फिरवली. घराला कुलूप घातलं आणि निघालो.
नगर जिल्ह्यातलं, श्रीगोंदा तालुक्यातलं घारगाव हे माझं गाव. शेतावरून पुणे हे अंतर पंचाहत्तर मैलाच्या आसपास. निम्म्या वाटेत मामाचं घर लागतं. अगदीच वाटेत नाही. पण वाट थोडीशी वाकडी केली की मामाकडे जाता येतं. त्यांची गाठभेट होते. ख्याली खुशाली कळते. खुशाली कळायला फोन हे माध्यम आता उपलब्ध आहे. पण प्रत्यक्ष भेटीचं सुख वेगळंच. शब्दांमध्ये बऱ्याचदा औपचारिकता असते आणि प्रत्यक्ष भेटीत निव्वळ आनंद असतो. त्यामुळे मी गावाकडे जाताना अथवा येताना वाट वाकडी करतोच. मामांची भेट घेतोच. 94 वर्षांची आजी आहे. तिचीही भेट होते.
मामांना देखील शेती आहेच. परंतु त्यांच्याकडे बाजरी करत नाहीत. लोण्यासारखी माती आहे. कडेने भीमेचं पाणी आहे. त्यामुळे ते आपलं ऊसासारखं नगदी पीक घेतात. बाजरी सारखी भुसार पिकं नाहीत करत बसत. परंतु माझ्या गावाकडे मात्र जमीन मुरमाची आहे. पावसाची वानवा आहे. बगलेला एक ओढा आहे म्हणून बरं. पण तरीही पावसाळा संपला की महिन्या दोन महिन्यांत पाण्याला आट येते. विहिरी खोल जातात. उन्हाळ्यात दोन एक ऊस जागवण्याचीच मारामार. मग बाकीची शेती कशाच्या भरवशावर पिकवायची? त्यामुळे मला पावसाच्या तालावर येणारी बाजरी, डाळी अशी पिकं घ्यावीच लागतात.
तर त्यादिवशी मी बाजरीची गोणी गाडीत टाकली. वाट वाकडी केली आणि मामांकडे पोहचलो. मामींनी स्वयंपाक केला. आग्रहाने जेवायला घातलं. माझ्या मामांकडे बघितलं की मला “मामाच्या गावाला जाऊ या…’ या गीतातला मामा आठवतो. मामाही प्रेमळ आणि मामीही. “रोज रोज शिखरण पोळी’ नसली तरी जे ताटात वाढलं जातं ते अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने. ते प्रेम ओंजळीत घ्यायचं म्हणूनच मी मामांकडे जातो.
जेवण झालं. गप्पाटप्पा झाल्या आणि मी निघालो. निघताना मला आठवण झाली. म्हणालो, “मामा बाजरी हवी का?’
मामा म्हणाले, “नको, आम्ही दोघेच तर घरात. बाजरी नाहीच खात फारशी.’
पुन्हा म्हणाले, “दोन-चार किलो दे. मी इथे पाखरांना घालत जाईन. पाखरांना घालण्यासाठी मी काही बाजरी विकत घेत असतोच. परंतु आता तू आणली आहेस तर दे दोन चार किलो.’
“तुम्हाला खाण्यासाठी हवी असेल तर देतो. पाखरांना घालण्यासाठी अजिबात देणार नाही.’ मी म्हणालो.
“का रे?’ माझ्या नकाराचं कारण मामांना जाणून घ्यायचं होतं. काही खास कारण असल्याशिवाय मी नकार देणार नाही याची मामांना खात्री होती. त्यामुळे मी काय म्हणतोय याची त्यांना उत्सुकता होती.
“मामा पाखरांना त्यांचा चारा कसा मिळवायचा याचं ज्ञान असतं. तेवढं बळ देखील त्यांच्या पंखात असतं. आपण त्यांना असा चारा घालत बसलो तर माणसांसारखे तेही आळशी होतील. त्यांच्या पंखातली चाऱ्यासाठी दूर जाण्याची क्षमता नाहीशी होईल. आपण अशा प्रकारे त्यांना चारा पुरवून त्यांना आळशी करतो आहोत. पाखरांना चारा पुरवणं हे आपलं काम नाही. त्यासाठी देवाने त्यांना पंख दिले आहेत आणि त्या पंखात उडण्याचं बळ देखील भरलं आहे.’
“अरे हो रे, बरोबर आहे तुझं. पण ठीक आहे. पाखरांसाठी नाही पण आमच्यासाठी दोन किलो बाजरी राहू दे.’ म्हणत मामांनी दोन किलो बाजरी काढून घेतली. मामांचा निरोप घेऊन मी निघालो. पण खरंच माणूस का चारा घालत असेल पाखरांना? गावाकडचा माणूस जोंधळ्याची राखण करताना, गोफण फिरवून मेटाकुटीला येतो आणि शहरातला माणूस विकतचं धान्य घेऊन पाखरांना घालतो. कशासाठी करत असेल तो असं. मला वाटतं पाखरांना चारा घालण्यामागे पुण्य गाठीला मारण्याचीच भावना माणसाच्या मनात असावी. नाहीतरी माणसाला आवळा देऊन कोहळा काढायची सवय आहेच.
पण पाखरांना दाणे भरवणारे माझे मामा एकटेच नाहीत. शहरात अनेकजण पाखरांना दाणे भरवतात. पाखरांना चारा आणि पाणी पुरवण्यासाठी आव्हान करणारेही अनेकजण आहेत. भीक मागणारा माणूस आपण बघितला आहे. परंतु दाण्यासाठी माणसाच्या दारात येऊन बसलेली पाखरं कधी बघितली नाहीत. शहरातली झाडं झुडपं नष्ट होत आहेत. पाखरांसाठीचा अधिवास कमी होतो आहे. शहराच्या अवतीभोवतीची शेती कमी होते आहे. त्यामुळे शहरात पाखरं दिसायला हवी असतील तर त्यांना घरट्यासाठी जागा द्यायला हवी. चारा पुरवायला हवा. पाणी पुरवायला हवं असं सांगितलं जातं. वास्तविक झाडं झुडपं कमी होत आहेत म्हणून पाखरांना घरट्यासाठी जागा पुरवायला हवी हे मान्य. पाखरांसाठी घरटी बांधायला हवी हेही मान्य. परंतु मानवनिर्मित घरट्यांमध्ये चिमणी, पारवे असे पक्षी येऊन बसतील. इतर पाखरांच काय? बरं चिमणी तर चिमणी. तिच्यासाठी गॅलरीच्या कोपऱ्यात एखादं घरटं नक्की बांधा. परंतु पाखरांना माणसाने चारा पुरविण्याची अजिबात गरज नाही.
पाखरांच्या पंखात बळ आहे. ते त्यांचा चारा मिळवू शकतात. परंतु पाखरांना चारा पुरवण्यामागे माणसांना पाखरांच्या पोटाची काळजी असते असं नाही. पाखरांना चारा भरवून माणूस पुण्य गाठीला मारू इच्छित असतो. चाराण्याचा चारा पुरवून पुण्य साधायचं आणि आपलं बाराण्याचं पाप झाकायचा यासाठी माणूस पाखरांना चारा पुरवतो. भुकेने मेलेलं पाखरू कुणी बघितलं नाही. आपण पाखरांना “स्पून फिडींग’ करण्याची गरज नाही. आपण पाखरांना चारा घालत बसलो तर आभाळात झेप घेण्याच्या, चाऱ्यासाठी दूरवर जाण्याच्या क्षमतेचाच त्यांना विसर पडेल आणि त्या पापाचे वाटेकरी फक्त आपण असू.
– आरसा-
विजय शेंडगे