नवीदिल्ली – समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव अर्थात नेताजी यांचे नुकतेच निधन झाले. प्रकृती खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात व्हॅन्टिलेटरवर होते. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण समाजवादी पार्टीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलायम सिंह यांचा राजकीय प्रवास चांगलाच रंजक आहे. मुलायम सिंह यांना आपली पहिली आमदारकीची निवडणूक लढता यावी यासाठी ‘सैफई’ गावच्या लोकांना एकवेळसच्या जेवणाचा त्याग केला होता.
विधानसभा १९६७ च्या निवडणुकीची गोष्ट आहे. जेव्हा मुलायम सिंह यादव यांना निवडणूक लढवायची होती पण पैसे नव्हते. ते पैशाची व्यवस्था करण्यात व्यस्त होते पण व्यवस्था होत नव्हती. निवडणूक प्रचारादरम्यान एके दिवशी त्यांच्या घराच्या गच्चीवर संपूर्ण गावकऱ्यांची बैठक झाली. ज्यात सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. यावेळी एका गावकऱ्याने प्रस्ताव मांडला की पुढचे ८ दिवस गावाने एका वेळेसच अन्न त्याग करून त्यातून वाचलेले पैसे मुलायम यांना मदत म्हणून द्यायचे. जमलेल्या संपूर्ण गावाने हा प्रस्ताव मान्य केला आणि जेवण न करता पैसे वाचवून मुलायम यांना देण्याचा निर्धार केला. मुलायमसिंह यादव यांनी निवडणूक लढवली आणि इटावा जिल्ह्यातील जसवंतनगर मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले हे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाचे फळ होते.
त्यावेळी मुलायम यांनी निवडणूक लढवण्यासाठी देणग्या मागितल्या होत्या. मुलायम आपल्या भाषणांमध्ये लोकांना एक वोट आणि एक नोट (एक रुपया) देण्याचे आवाहन करायचे. ते म्हणायचे की, आम्ही आमदार झालो,तर कसा तरी, तुमचा एक रुपया व्याजासह परत करू हे ऐकून ग्रामस्थ त्यांना मदत करायचे. मुलायमसिंह यादव यांना राजकारणात आणण्याचे श्रेय तत्कालीन तगडे नेते नथू सिंग यांना जाते, ज्यांनी मुलायमसिंह यांच्यासाठी आपली जागा सोडली. त्यांना उमेदवारी देऊन सर्वात कमी वयात आमदार केले.