लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिलं. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारी व महिला अत्याचार प्रकारणांवरून योगी सरकारला धारेवर धरलं आहे. याचा समाचार घेताना आदित्यनाथ यांनी, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यांच्या “लड़के, लड़के हैं… गलती हो जाती है!” या वक्तव्याचा दाखल देत विरोधकांचा आकांडतांडव बेगडी असल्याचा आरोप केला.
समाजवादी पक्षाचे आमदार राज्यपालांचे भाषण सुरु असताना व्यासपीठाकडे कागदी गोळे फेकून मारत असत अशी आठवण सांगताना त्यांनी, “सत्तेत असताना ज्यांनी संविधानाची पायमल्ली केली तेच आज आम्हाला संविधान शिकवतायेत. अशा लोकांनी शांत बसणं योग्य ठरेल अथवा त्यांचा पर्दाफाश केला जाईल” असा खरमरीत इशारा दिला.
काँग्रेसवरही ताशेरे
महिला अत्याचारावरून योगी सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसला आदित्यनाथ यांनी ‘तंदूर’ प्रकरणाची आठवण करून दिली. या प्रकरणामध्ये २३ वर्षांपूर्वी सुशील शर्मा नामक काँग्रेसच्या युवक अध्यक्षाने पत्नीचा खून करून तिचा मृतदेह एका पंचतारांकित हॉटेलच्या भट्टीत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
वर्षानुवर्षांची घाण एका रात्रीत साफ होणार नाही
आपल्या सरकारच्या ३ वर्षांच्या कार्यकाळाबाबत बोलताना आदित्यनाथ यांनी राज्य सर्वच आघाड्यांवर प्रगती पथावर असून मागच्या सरकारांनी वर्षानुवर्षे केलेली घाण साफ करायला वेळ लागेल असा दावा केला. यावेळी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी कमी झाली असल्याचा एनसीआरबीचा अहवाल आपल्या टॅबलेटरवर दाखवल्याने योगींचें टेक्नोसॅव्ही रूप समोर आले.