नवी दिल्ली – भारताबरोबरच जगभर आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनाचा उपयोग वेगात वाढणार आहे. या दृष्टिकोनातून भारत स्वावलंबी व्हावा याकरिता टाटा समूहाने नवी बॅटरी कंपनी तयार करण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली असल्याचे टाटा समूहाचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.
भविष्याबद्दल गरजा ध्यानात घेऊन विविध क्षेत्रांमध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून टाटा समूह आपले कर्तव्य पार पाडणार आहे. टाटा समुह लवकरच शुन्य कार्बन उत्सर्जनासाठीचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.
विविध क्षेत्रात पर्यायी इंधनाचा वापर वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून या इंधनाला लागणाऱ्या उपकरणांची निर्मिती करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतामध्ये बऱ्याच कंपन्यांनी हायड्रोजन, सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन इत्यादी क्षेत्रांमध्ये पुढाकार घेतला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळामध्ये विविध क्षेत्रात डिजिटल टेक्नोलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून टाटा समूह या क्षेत्रातही पुढाकार घेत असल्याचे ते म्हणाले.
टाटा समूहाने ई-कॉमर्स क्षेत्रात आगेकूच करण्यासाठी नुकतेच एक सुपर ऍप सुरू केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. टाटा समूहाने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये बराच पुढाकार घेतला असून आतापर्यंत जवळ जवळ अर्धा डझन इलेक्ट्रिक कार भारतामध्ये सादर केल्या आहेत. भारतीय ग्राहकांनी या इलेक्ट्रिक कारला आतापर्यंत उत्तम प्रतिसाद दिला आहे. आगामी काळातही इलेक्ट्रिक वाहने सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.