नवी दिल्ली – शैक्षणिक संस्थाकडून आणि विद्यार्थ्याकडून कागदाचा वापर वाढणार आहे. त्याचबरोबर भारतामध्ये रिटेल क्षेत्र पॅकेजींग करून वस्तूचे वितरण वाढविणार आहे. अशा परिस्थितीमध्ये यावर्षी कागदाचा वापर सहा ते सात टक्क्यांनी वाढून 30 दशलक्ष टन टनावर जाण्याची शक्यता आहे.
इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की भारतामध्ये दरडोई कागदाचा वापर जागतिक वापरापेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे हा वापर वाढण्याची शक्यता आहे. भारतामध्ये जगाच्या 15 टक्के एवढी लोकसंख्या राहते. मात्र जागतिक कागदातील फक्त पाच टक्के कागद भारतात वापरला जातो. भारतामध्ये रिटेल क्षेत्रात ई-कॉमर्स प्रभाव वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू बरोबरच औषधे, कापड इत्यादी क्षेत्रांमध्ये पॅकेजिंगची गरज वाढली आहे.
अशा परिस्थितीमध्य या वर्षी कागदाचा वापर सहा ते सात टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. भारतातील कागद निर्मात्या कंपन्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली असून गेल्या सात वर्षांमध्ये या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष ए एस मेहता यांनी सांगितले.
भारतात सर्वसाधारणपणे वर्षाला 80 हजार कोटी रुपयांचा कागद वापरला जातो. करोनाच्या काळामध्ये वृत्तपत्राचा कागद आणि वह्यासाठीचा कागद कमी वापरला गेला असला तरी रिटेल क्षेत्रातून कागदाच्या पॅकेजिंगसाठी मागणी वाढली आहे. आगामी काळामध्ये अर्थव्यवस्था विस्तारित होण्याची शक्यता असल्यामुळे त्या प्रमाणात कागदाचाही वापर वाढू शकतो असे ते म्हणाले.