मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेला ‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्ष’ हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही केवळ मोहीम न राहता ती सवय बनणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
‘मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षा’चा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. वर्ल्ड रिसोर्सेस इंडिया (डब्ल्यूआरआय) संस्थेच्या सहकार्याने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे उपमहापौर ॲड.सुहास वाडकर, स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ.संजीवकुमार, उपायुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्यशासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई इलेक्ट्रिक वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरूवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिंग स्थानके वाढविण्यासारख्या पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या 386 बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन 2027 पूर्वी 100 टक्के बसेस इलेक्ट्रिक असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून श्री.ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्याकरिता शक्य त्या सर्व उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून हवा आणि ध्वनीचे प्रदूषण थांबविणे तसेच इंधनाचा वापर कमी करणे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे ही त्यापैकीच एक उपाययोजना आहे. मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रिक वाहन कक्षामार्फत प्रयत्न करण्यात येणार असून या उपक्रमाला शुभेच्छा. मुंबईसह राज्यात लवकरच मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने धावू लागतील आणि वाहनांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यात आपण आघाडीचे राज्य बनू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीवकुमार यांनी महानगरपालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. मुंबई इलेक्ट्रिक व्हेईकल कक्षाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, ई-मोबिलिटी तज्ज्ञ, इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणण्याचे कार्य केले जाणार आहे. विद्युत वाहनांच्या प्रचारासाठी निर्णय घेण्यासाठी धोरणकर्त्यांना सहाय्य करणे, मुंबई महानगरात विद्युत वाहन चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्युत वाहनांच्या खरेदीसाठी सुलभरित्या कर्ज सुविधा उपलब्ध करुन देणे, वाहनांमधील बॅटरींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अंमलात आणणे, बेस्टच्या सहयोगाने इलेक्ट्रिक बसेसचा ताफा तयार करणे, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करणे, मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर कामकाज करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील नवउद्योजकांना सहाय्य करणे अशी विविध कार्ये या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.