मुंबई – रशियाने युक्रेनवर हल्ला करून युद्ध सुरू केल्यामुळे या दोन देशांकडून होणारी निर्यात थांबल्याने अन्नधाऩ्य आणि मसाल्यांसाठी अनेक देशांनी भारताकडे मोर्चा वळवला असल्याने भारतात उत्पादित झालेल्या गहू, मका आणि मसाल्यांना असणारी मागणी वाढली आहे. गुजरातमधील कांडला बंदरात गेल्या चार दिवसांमध्ये गव्हाची किंमत क्विंटलला 2200 वरून 2350-2400 रुपयांपर्यंत पोचली आहे.
भारतीय अन्नधान्य महामंडळाची (एफसीआय) आगामी निविदा या आठवड्यात येणार असून ती मार्च महिन्यातील शेवटची निविदा असेल. त्यामुळे पुढील पंधरवड्यापासून भाव आणखी वाढण्यास सुरवात होईल, असे या क्षेत्रातील माहितगारांचे म्हणणे आहे. आता बैसाखीनंतर म्हणजे 13 एप्रिलनंतरच नव्या गव्हाची कापणी सुरू होईल.
देशातील गव्हाचा बहुतांश साठ सरकारी मालकीच्या अन्नधान्य महामंडळाकडे आहे. मात्र महामंडळ गव्हाची निर्यात करण्याच्या मनस्थितीत नाही. व्यापाऱ्यांना मात्र, महामंडळाने गव्हाचा मोठा साठा बाजरात आणावा असे वाटत आहे. त्यामुळे देशातील गव्हाचा अतिरिक्त साठा कमी होण्यास आणि निर्यातीची मागणी पूर्ण होण्यास तसेच गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहण्यास मदत होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गव्हावरील प्रक्रिया उद्योगाने मात्र,
गव्हाच्या निर्यातीवर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. मागील चार दिवसांमध्ये देशात किरकोळ गव्हाच्या भावात किलोमागे 21 रुपयांवरून 24 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
निर्यातीची मागणी इतकी प्रचंड आहे की, आपण ती पूर्ण करू शकत नाही आणि त्यातून गव्हाचा भाव वाढण्याची आणि भविष्यात देशात तुटवडा निर्माण होण्याची भिती प्रक्रिया उद्योगातील माहितगारांनी व्यक्त केली आहे. युक्रेनमधून मक्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आता अनेक देशांनी मक्यासाठी भारताकडे मोर्चा वळवला आहे.
तंत्रज्ञानाद्वारे गुणसूत्रांमध्ये बदल न केलेला (नॉन जेनेटिकली मॉडिफाईड) मका युक्रेनमधून निर्यात करण्यात येतो. काळ्या समुद्राच्या परिसरात तणाव वाढल्याने मालवाहतूक जहाजांची भाडी वाढली आहेत. त्यामुळे दक्षिण आशियातील मक्याची मागणी भारताकडे वळण्याची चिन्हे आहेत. कारण दक्षिण आशियाची मक्याची मागणी पूर्ण करण्याची क्षमता सध्यातरी दुसऱ्या कुणाकडे नाही. म्यानमारमध्ये लष्करी उठाव झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून भारतातून होणारी मक्याची निर्यात वाढली आहे.
स्थानिक बाजारपेठेतील मसाल्यांचा तुटवडा आणि जगभरातून मसाल्यांना मोठी मागणी असल्याने मसाल्यांच्या किंमतीतही वाढ होत आहे. युक्रेन हा धन्याच्या निर्यातीतील प्रमुख देश आहे. गेल्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारपेठेत धनेपूड किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आता युक्रेन परिसरातून धने निर्यातीवर मर्यादा आल्याने भारतीय धने निर्यातीला मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.
जिऱ्याच्या किंमतीतही गेल्या चार महिन्यांमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. त्यामागे कमी झालेले उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय संबंधांतील तणाव कारणीभूत आहे. अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि सिरिया या देशांमधील उत्पादन विविध अंतर्गत व आंतरराष्ट्रीय कारणांमुळे कमी झाले असल्याने जिऱ्याचा पुरवठा करणारा भारत हा प्रमुख देश बनला आहे. त्याचबरोबर कापूस, सूत आणि धागे आणि तयार कपड्यांच्या निर्यातीलाही मागणी वाढली आहे.
गेल्या वर्षभरात कापसाच्या किंमतीत 135 रुपये किलोवरून 219 रुपये किलोपर्यंत वाढ झालेली आहे. त्याचबरोबर कापूस निर्यातीसाठीचे करार कसे पूर्ण करायचे असा प्रश्न निर्यातदारांसमोर आहे. साऊथ इंडियन मिल्स असोसिएशनने कापसाच्या चाळीस लाख गाठींची निर्यात करण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे.