ठाणे – महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी 10 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.
या खटल्याची सुनावणी आजपासून सुरू होणार होती. परंतु तक्रारदाराच्या वकिलाने आपला क्लायंट काही वैयक्तिक कारणास्तव शहराबाहेर असल्याचे सांगून आजच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात हा खटला दाखल केला आहे.
29 जानेवारी रोजी या प्रकरणात झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशाचा हवाला दिला होता, ज्यामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भिवंडी कोर्टाने म्हटले होते की गांधींवरील खटला याच श्रेणीत येतो.
त्यामुळे या खटल्याची प्राधान्याने आणि दैनंदिन स्वरूपात सुनावणी करणे आवश्यक आहे. सन 2014 साली भिवंडी येथील सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा कुंटे यांनी केला होता.