कोल्हापूर -आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाच्या माऱ्याने विशाळगडावरील बुरूज ढासळला आहे. ही घटना आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास घडली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र गेल्या शेकडो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत गडकिल्ले पाय घट्ट रोवून उभे आहेत. तेच आता ढासळत चालले असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. नुकतंच पन्हाळा गडावरील सुद्धा बुरुजाचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर कोल्हापुरात संवर्धनाच्या मागणीसाठी एक चळवळ उभी राहत आहे. असे असतानाच आता विशाळगडाचा सुद्धा बुरुज कोसळला आहे.
दरम्यान, विशाळगडावर जाण्यासाठी लोखंडी जिना आहे. त्याच्या बाजूलाच असणारा दगडी बुरुज ढासळला असून हा लोखंडी जिना ये जा करणेसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी, नागरिकांनी पर्यायी रोडने गडावर येत- जात करावी असे आवाहन करण्यात आले आहे. शाहूवाडी पोलिसांनी याबाबत माहीती दिली. दरम्यान, पन्हाळा गडानंतर आता विशाळगड सुद्धा ढासळत चालला असल्याने प्रशासनाचे गडकिल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल सुद्धा शिवप्रेमी करत आहेत.