पुणे – “महा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर आता “बुलबुल’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याची तीव्रता वाढली असून, पश्चिम बंगाल व ओरिसाच्या दिशेने हे वादळ सरकत आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे.
याबद्दल हवामान खात्याने अधिक माहिती दिली आहे. “महा’ वादळाची तीव्रता संपल्यामुळे आता राज्यात सध्या तरी कुठल्याही प्रकारचे वातावरण बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “बुलबुल’ चक्रीवादळामुळे पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हे वादळ गुरुवारपर्यंत आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या जवळ होते.
पण, शुक्रवारी वादळाने दिशा बदलत आणखी ईशान्यकडे सरकले आहे. त्यामुळे आता त्याचा धोका पश्चिम बंगाल व बांग्लादेशला निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ओरिसालासुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे वादळ पश्चिम बंगालपासून सुमारे 680 किलोमीटर अंतरावर समुद्रात आहे. यामुळे राज्यातील हवामानावर फारसा परिणाम होणार नाही. झाला तर विदर्भात काही भागात पाऊस पडू शकतो. पण, येत्या चोवीस तासांत हे वादळ आणखी ईशान्यकडे सरकल्यास महाराष्ट्रात याची झळ बसणार नाही.