मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथील पुणे – नाशिक रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी दोन महिन्यांतच पुन्हा खड्डे पडत असल्याने या रस्त्याचे नव्याने संपूर्ण डांबरीकरण करावे, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची डागडुजी सुरू झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नाशिक रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही सुरू झाली.
दरम्यान, या रस्त्याने दररोज हजारो जड वाहने प्रवास करतात.रस्त्यावरील खड्डे प्रशासनाच्या वतीने भरले जातात. परंतु, नुसते खड्डे न भरता संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. प्रलंबित बाह्यवळणाची कामे लवकरात लवकर मार्गी लागावीत याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणीही खासदार कोल्हे यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.