ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा निर्णय
नायगाव- पुरंदर तालुक्याच्या काही गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शासकीय टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता, परंतु गेल्या काही दिवसांपासून टॅंकर बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने पुन्हा टॅंकर सुरू केले आहेत.
पिंपरी, नायगावसह अन्य गावांतील टॅंकर बंद करण्यात आल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. त्यामुळे पिंपरी गावच्या सरपंच मीना शेंडकर व कृषिभूषण महादेव शेंडकर यांनी पुरंदर-दौंड उपविभागीय कार्यलयातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच नायगाव येथेही बंद केलेला टॅंकर सुरू करण्यासाठी सरपंच दिपाली जगताप, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत चौंडकर यांनी पाठपुरावा केला होता. याची दखल घेत पुरंदर-दौंड उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना बंद केलेले टॅंकर पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला आहे. बंद केलेले टॅंकर नावळी, वागदरवाडी, पिंपरी, नायगाव, टेकवडी या गावांत पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाई असेपर्यंत टॅंकर सुरू राहणार असल्याचे पिंपरीच्या सरपंच मीना शेंडकर सांगितले.