बारामती -बारामती शहर आणि तालुका परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून आकाश निरभ्र होते. बुधवारी (दि. 23) दुपारी 12 ते 2 वाजण्याच्या दरम्यान
सूर्याभोवती पडलेले खळे पाहण्यासाठी बारामतीकरांच्या नजरा आकाशाकडे खिळल्या होत्या. तब्बल दोन तास बारामतीत निसर्गाचे हे अनोखे रुप पहायला मिळाले.
ग्रामीण भागात याविषयी लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. यासंदर्भात पुण्याती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश तुपे म्हणाले की, आकाशात उंचावर पाणी असलेले ढग जेव्हा सूर्याच्या आड येतात,
त्यावेळी त्या ढगातील पाण्याच्या स्पटीकातून सूर्यकिरणे परावर्तित होतात. त्यामुळे सूर्याभोवती अशा प्रकारचे सप्तरंगी कडे निर्माण होते. सूर्याभोवती निर्माण झालेल्या तेजोमय वलयाचा आणि पाऊस पडण्याचा काहीही संबंध नसल्याचे डॉ. तुपे यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने इंद्रधनुष्य निर्माण होते त्याच पद्धतीने उंचावर असलेल्या ढगांमध्ये पाणी आणि बर्फ असतात. ढगांच्या वरच्या बाजूला सूर्य आला की सूर्याच्या प्रकाशामुळे ढगातील पाण्याचे रुपांत स्पटीकामध्ये होते आणि अशा पद्धतीने तेजोमय वलय निर्माण होते, अशी माहिती डॉ. तुपे यांनी दिली.
तर्कवितर्कांना उधाण
सूर्याला पडलेले खळे अनेकांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले तर सोशल मीडियावरही हे छायाचित्र तुफान व्हायरल केले गेले. हे खळे आकाशात बराच वेळ असल्याने याची चर्चा तालुकाभर पसरली होती, यामुळे बऱ्याच तर्कवितर्कांना उधाण आले.