नगर, (प्रतिनिधी) – त्रेतायुगात सर्वात जास्त आयुष्यमान हे मानवाचे होते. वाद विवाद, तंटे, भांडणे असूनही हे सगळे समाधानी होते. कारण रामराज्यात खरे ग्रामस्वराज्य होते. उद्या होणार्या संस्कार शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर देशात अध्यात्माचा डंका वाजणार आहे.
भारतीय अध्यात्म संपूर्ण जगाला मानवतावाद देणारा असेल. भारतीय अध्यात्माने सगळ्या जगाच्या आक्रमकांना सामावून घेतले पण स्वत्व कधीच विसरले नाही. ही त्या मातीची शक्ती आहे, अन ती शक्ती अध्यात्मामुळे आहे. महाराष्ट्राची वारकरी परंपरा संपूर्ण देशाच्या अध्यात्मिक बैठकीचा पाया आहे, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील श्रीक्षेत्र डोंगरगण येथील श्री ज्ञानेश योगआश्रम संस्थेचे प्रमुख गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवार (दि. 5) रोजी सकाळी ध्वजारोहन पूजन करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, उद्धव मंडलिक महाराज, डॉ.विकासानंद मिसाळ महाराज, हरीभाऊ भोंदे महाराज, जंगले महाराज शास्त्री, लक्ष्मण कदम महाराज, विजय शेवाळे, जालिंदर कदम, सर्जेराव मते, कैलास पटारे, राधाकिसन भुतकर, बबनराव पटारे, महेश मडके महाराज, नामदेव ढोकणे, सीताराम दाणी, संतोष खेत्री आदींसह डोंगरगण, मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, येथील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते. यावेळी सकाळी मांजरसुंबा, पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता, शेंडी, डोंगरगण अशी पताका ध्वज रॅली काढण्यात आली.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले म्हणाले, राज्यात अध्यात्माचा सोहळा झाला नाही, असा सोहळा आपण करणार आहोत. जंगले महाराज शास्त्री यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार (दि.15) रोजी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवार (दि.8) रोजी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे. सप्ताहकाळात दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 8 ते 9 पसायदान, प्रवचन, सकाळी 10 ते 12 कीर्तन, दुपारी 3 ते 4 प्रवचन, दुपारी 4 ते 5 नामजप, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे कीर्तन होणार आहे.
यावेळी निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, भागवत महाराज जंगले, गणेश महाराज पाटील, चिदंबरेश्वर महाराज साखरे, श्रीनिवास महाराज घुगे, पांडुरंग महाराज घुले, रामकृष्ण महाराज लहवितकर, संजय महाराज पाचपोर, कान्होबा महाराज देहूकर, जयवंत महाराज बोधले, योगिराज महाराज गोसावी, चैतन्य महाराज देगलूरकर, प्रकाश महाराज बोधले, चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होणार आहे. तर जंगले महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
अमृत महोत्सवी शेतकर्यांसाठी कृषी प्रदर्शन
अमृत महोत्सवी शेतकर्यांसाठी कृषी प्रदर्शन, आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, आयुष्मान भारत कार्ड वितरण अशा लोकोपयोगी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. डोंगरगण परिसरातील भव्य-दिव्य सोहळा होणार असून चारचाकी वाहने, टेम्पो, रिक्षा, दुचाकी यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.