औंध, दि. 18 (प्रतिनिधी) – दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार आहे की नाही? त्या भावात जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांना मिळाल्या पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, या सर्व गोष्टींना तिलांजली देण्याचे काम आत्ताचे केंद्र व राज्य सरकार करीत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बाणेर, बालेवाडी, सूस व म्हाळुंगे यांच्या वतीने बाणेर येथे दिवाळी सरंजाम किटचे वितरण पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये पावसामुळे तेथील केलेला खोटा विकास उघडा पडला आहे. दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसात या दोन्ही स्मार्ट सिटी पाण्यामध्ये तरंगताना संपूर्ण राज्याने पाहिले आहे, असे पवार यांनी सांगितले.
यावेळी मारुतराव धनकुडे, खासदार ऍड. वंदना चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुनील गव्हाणे, अंकुश काकडे, सूर्यकांत पाठक, सुनील चांदेरे, ज्ञानेश्वर तापकीर, प्रमोद निम्हण, मंगलदास मुरकुटे, दिलीप मुरकुटे, चंद्रकांत जाधव, रोहिणी चिमटे, ज्योती सुर्यवंशी,सुहास भोते आदी उपस्थित होते. कोथरुड मतदारसंघाचे कार्याध्यक्ष नितीन कळमकर, राहुल बालवडकर, डॉ. सागर बालवडकर, समिर चांदेरे तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.
बाणेर-बालेवाडी-सूस व म्हाळुंगे प्रभागातील कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याकरीता 2006 पासून हा सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबवत आहे. आज 15 हजार पेक्षा अधिक कुटुंबांना सरंजाम किट देण्यात आले. वाढलेल्या महागाईत हजारो कुटुंबियांची दिवाळी गोड करता आली याचे समाधान आहे.
– बाबुराव चांदेरे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती