सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना अग्निवीर योजनेतून लष्करात दाखल झालेले अक्षय गवते यांचे निधन झाले. अग्निवीर जवानांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांना मिळत असलेला लाभ, आणि सैन्यदलातील सेवेचा मिळत नसलेला शहीद हा दर्जा यावरुन ही भरतीप्रक्रिया वादग्रस्त ठरत आहे. अक्षय गवते यांच्या निधनानंतर सेवेतील इतर लाभ त्यांना मिळणार नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.
मात्र भारतीय सैन्यदलाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही अक्षय गवते यांच्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटरवर (एक्स) ही माहिती देण्यात आली आहे.
सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी
जाहीर केली आहे.
जवान अक्षय गवते हे… pic.twitter.com/66b4L5XwVG— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 26, 2023
“सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षय यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली”, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराकडून देखील अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना भरपाई स्वरूपात १ कोटी १३ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यात आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युल्टी फंडमधून दिला जाणारा निधी, आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर फंडमधून दिला जाणारा निधी, नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, सेवा निधी यांचा समावेश आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
दरम्यान, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीट करत सरकारवर टीका केली होती. ‘सियाचिन ग्लेशियर येथे देशसेवेसाठी उभा असलेला अग्नीवीर अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. एका गरीब कुटुंबाचा आधारच निघून गेला. संपूर्ण परिवार दु:खात आहे. आता ना काही पेन्शन मिळणार, ना ग्रॅज्युटी मिळणार, ना कुठला सैनिकी सन्मान मिळणार. अग्नीवीर योजना म्हणजे बेरोजगार युवकांची थट्टा आहे,’ असे आव्हाड यांनी म्हटले होते.