अहमदाबाद – शिवसेनेचा ताबा मिळवण्यावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिंदे गटाची बाजू घेतली आहे. शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना आहे. त्या गटालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळायला हवे, अशी भूमिका त्यांनी बुधवारी येथे मांडली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग शिंदे गटाला खरी शिवसेना ठरवतील असे मला वाटते, असे आठवले पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांनी शिवसेनेतील फुटीमागे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याची शक्यता फेटाळून लावली.
शिवसेनेतील असंतोषामुळे बंड झाल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उर्वरित कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती 200 पर्यंत जागा मिळवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.