लोणंद, (प्रतिनिधी) – गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने, नेहमीच दुष्काळग्रस्त असलेल्या फलटण तालुक्याच्या पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. खंडाळा तालुक्याच्या पूर्वेकडील भागासही दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत.
लोणंदच्या पूर्वेस असलेल्या आरडगाव, कापडगाव, चव्हाणवाडी, चांभारवाडी, हिंगणगाव, आदर्की बुद्रुक, कापशी, परहर बुद्रुक टाकुबाईचीवाडी आदी फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमधील नागरिकांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यापैकी बहुतांश गावांत आठवड्यातून एक किंवा दोन वेळा फक्त दहा ते पंधरा मिनिटे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.
अनेक गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबर शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पाणी व चार्याअभावी जनावरांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी अनेक शेतकर्यांनी लोणंदच्या बाजारात मिळेल त्या भावात जनावरे विकून दावणी मोकळ्या केल्या आहेत.
यावर्षी धरणांच्या पाणीसठ्यातही कमालीची घट झाली असल्याने दुष्काळाची दाहकता अधिक वाढणार आहे. नीरा-देवघर धरणातील पाणीसाठा 37.05 टक्क्यांवर (4.3 टीएमसी) आला आहे. भाटघर धरणात अजूनही 40.44 टक्के (9.5 टीएमसी) पाणीसाठा आहे,
तर वीर धरणात 47.14 टक्के (4.4 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध असून, गुंजवणीत 50.46 टक्के (1.9 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. याच पाण्यावर पावसाळा येईपर्यंत सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.
फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथील बुरसुंडी धरण सध्या कोरडे पडले आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रातील हिंगणगाव, सासवड, आदर्की बुद्रुक, कापशी, परहर बुद्रुक, टाकुबाईची वाडी या गावांमधील नागरिक पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. खंडाळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे.
सध्या तालुक्यात 24 गावे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रामुख्याने निंबोडी, पाडळी, बोरी, वेळेवाडी, खेड बुद्रुक, अहिरे, हरळी, म्हावशी, अजनुज, घाटदरे, मोर्वे ही गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.