पुणे – आरोग्य सेवा देणे आणि गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हिच खरी सेवा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कोविडने आरोग्यसेवा किती महत्वाची हे दाखवून दिले. त्यामुळेच शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाउंडेशन आणि निरामय फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर महाआरोग्य शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जून खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ. अजय चंदनवाले, धीरज घाटे, जगदीश मुळीक, राजन तेली, विद्याधर अनास्कर उपस्थित होते. शिबिरामध्ये 60 हजार रुग्णांनी लाभ घेतला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वर्गीय विनायक निम्हण हे जनसमान्यांच्या प्रति संवदेना असलेले, समाजाची स्पंदने ज्याला समजतात असे सामाजिक नेतृत्व होते. अजित पवार यांनी आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटीची तरतूद केली तर राज्यात 700 ठिकाणी हिंदुुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केल्याचे सांगितले. राज्यातील सर्व जिल्ह्यात अशाप्रकारे शिबिरे घेण्यात येणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. शिबिराच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना विनामुल्य आरोग्यसेवा मिळते, असे छगन भुजबळ तर वैद्यकीय उपचाराला मर्यादा येतात, त्यावेळी ही आरोग्य शिबिर चांगली सेवा आणि उपयोगी ठरतात. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वडेट्टीवार म्हणाले की, माणसात आणि सेवेत देव आहे, असे समजून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रामेश्वर नाईक आणि सनी निम्हण यांनी मनोगत व्यक्त केले.