पुणे – मागील काही दिवसांत शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीबाबत घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे पोलिसांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मंडळे बैठकीत पोलसांना सर्वोपोतरी सहकार्य करण्याची भूमिका घेत आहेत. दिलेल्या वेळा पाळण्याचेही वचन दिले जात आहे. मात्र, दुसरीकडे पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे.
मंडळांच्या मानापमान नाट्यात राजकारण दिसून येत आहे. यामुळे पोलिसांना विसर्जन मिरवणुकीत मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “आमची मंडळांशी चर्चा झाली असल्याने काही अडचण येणार नाही,’ असे छातीठोकपणे सांगत आहेत. पण, त्यात आत्मविश्वासाचा अभाव दिसून आला.
मानाचे गणपती मार्गस्थ झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी चार वाजता निघण्याचा निर्णय घेतला आहे. तर अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, हुतात्मा बाबू गेणू मंडळ ट्रस्ट आणि जिलब्या मारुती गणपती मंडळ ट्रस्ट यांनी सायंकाळी नेहमीच्या वेळेत निघण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना त्यांनी “दरवर्षीच्या नियोजित वेळेपेक्षा आधी निघणे शक्य होत नाही.
मानाच्या मंडळानंतर इतर मंडळे मार्गस्थ होतात. त्यामुळे ती मंडळे जाईपर्यंत इतर मंडळांना लवकर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही नेहमीच्याच वेळेत सहभागी होणार,’ अशी भूमिका घेतली आहे. “तसे आम्ही सहा वाजताही निघण्याचा प्रयत्न करू. आम्ही रात्री साडेआठ वाजताही समाधान चौकात येऊ. त्यासाठी पोलिसांनी आम्हाला टिळक पुतळा ते लक्ष्मी रस्ता मोकळा करुन द्यावा,’ अशी भूमिका घेतली आहे.
यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ झाल्यावर त्यामागे इतर मंडळे सोडण्यात येणार आहेत का? सायंकाळी चार ते सहा या वेळेतील “गॅप’ कसा भरुन काढणार? यावर मात्र पोलिसांनी उत्तर देणे टाळले. तर मानाच्या आणि महत्त्वाच्या मंडळांशी पोलीस संवाद साधत असताना इतर मंडळांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना काही मंडळांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचा परिणामही ऐनवेळी मिरवणुकीत दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडेच नाहीत उत्तरे
पोलिसांनी प्रत्येक गणेश मंडळास एक फॉर्म दिला आहे. मंडळापुढे किती पथके असणार आहेत, हे त्यामध्ये लिहून घेतले जात आहे. पथकांची संख्या दोन ते तीन असणार आहे. तर एका पथकात 50 ढोल आणि 15 ताशे असतील, असे सांगितले जात आहे. मात्र, किती मंडळे दोन तर किती मंडळे तीन पथके ठेवणार आहेत, याची माहिती पोलिसांकडे नाही. ढोल वादनासंदर्भातही पोलिसांकडे काहीच उत्तर नव्हते.