अनावश्यक नियंत्रणे रद्द करू – मोरारजी
हैदराबाद, दि. 26 – भ्रष्टाचारास वाव देणारी जी अनावश्यक नियंत्रणे असतील, ती सर्व रद्द करण्यात येतील, असे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी जाहीर केले. मोरारजी देसाई पुढे म्हणाले, तांदळाच्या वाहतुकीवरील निर्बंध रद्द करून, त्याबाबतीत संपूर्ण देश हा एक विभाग करण्याच्या दृष्टीने सरकार विचार करील. (आंध्र प्रदेश सरकारने तशी सूचना केलेली आहे.)
भाव खाली येत आहेत
पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले, की तांदूळ, खाद्य तेले व गहू यांचे भाव खाली येत आहेत. तांदूळ, साखर व गहू यांचे पुरेसे उत्पादन झालेले आहे. त्यामुळे भाव आणखी खाली येतील अशी शक्यता वाटते.
मालमत्तेचा मूलभूत हक्क वगळावा
जिंद (हरियाणा) – देशातील आर्थिक असमानता सरकारने दूर करावी, अशी मागणी आर्य समाजाने आयोजित केलेल्या समाज संमेलनात करण्यात आली. या मालमत्तेचा हक्क घटनेच्या मूलभूत हक्कातून वगळावा, अशी मागणीही ठरावात करण्यात आली आहे.
माणसाचा मेंदू जड होत आहे
नवी दिल्ली – माणसाचा मेंदू हळूहळू जड होत आहे, असे दोघा ब्रिटिश तज्ज्ञांना आढळून आले आहे. त्यांना असे दिसले, की 1860 ते 1940 या कालावधीत पुरुषांच्या मेंदूचे सरासरी वजन 1372 ग्रॅम्स वरून 1424 ग्रॅम्स पर्यंत गेले, तर स्त्रीच्या मेंदूचे वजन 1242 ग्रॅम्स वरून 1265 ग्रॅम्स पर्यंत गेले आहे.