पिंपळे सौदागर – येथील लिनिअर गार्डनमध्ये येणाऱ्या नागरिकांची, युवकांची तसेच महिलांची सुरक्षा रामभरोसे आहे. येथे महापालिकेच्या उद्यान विभागाचे तसेच पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रेमीयुगुलांचा वावर वाढला असून, टवाळखोरांचे प्रस्थ वाढले आहे. त्यामुळे येथे लहान मोठ्या प्रमाणावर वाद होताना दिसून येत आहेत. येथे सुरक्षारक्षक तसेच पोलीस प्रशासनाची गस्त वाढविणे गरजेचे आहे.
प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर येथे पालिकेच्या वतीने 11 कोटी रुपये खर्चून लिनिअर गार्डन तयार केलेले आहे. गार्डन महापालिकेने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, नागरिक याच्यासाठी बनविले आहे. महापालिकेच्या व अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सदर गार्डनचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.
परंतु महापालिका प्रशासन, स्मार्ट सिटी, पोलीस यांच्या दुर्लक्षामुळे लिनिअर गार्डनची अवस्था दयनीय झाली आहे. या गार्डनमध्ये नागरिकांऐवजी टवाळखोर व प्रेमीयुगुलांचा वावर वाढला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना उद्यानात आले तर सुरक्षित वाटत नाही. किंवा प्रेमीयुगुलांचे सुरू असलेले चाळे नागरिकांना योग्य वाटत नसल्याने बहुतांश नागरिकांनी तिकडे पाठ फिरविल्याने तरुण-तरुणींना बसण्याचे एक मोठे ठिकाण येथे निर्माण झाले आहे.
महिलांची येथे कुचंबणा होत असल्याने महापालिकेतर्फे येथे सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. तसेच गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. टवाळखोरांकडून गार्डनमध्ये येणाऱ्या मुलींना छेडछाड केली जाते. त्यामुळे येथे सातत्याने लहान मोठे वाद होत आहेत.
बुधवार (दि. 3) रोजी काही टवाळखोरांनी गार्डनमध्ये कराटे सराव करणाऱ्या मुलींना त्रास देत असल्याने कराटे प्रशिक्षकांनी त्यांना सुनावले असता त्यांनी त्याला मारहान केली. त्यामुळे येथे सुरक्षारक्षक नियमने गरजेचे आहे. अशा सतत होणाऱ्या वादांमुळे स्थानिक नागरिक येथे येत नाहीत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेने उभारलेल्या उद्यान टवाळखोरांचा अड्डा बनला आहे.