ल्हासा – काही महिन्यांपूर्वी भारतातील उत्तराखंड येथे चमोली हिमक्षेत्रात बर्फाचा कडा कोसळून 80 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगाचे छप्पर मानला गेलेल्या तिबेटच्या हिमक्षेत्रात बर्फ वितळण्याचा धोका अधिकच वाढू लागल्याची बाब समोर आली आहे. जागतिक तापमानवाढीचा धोका तिबेटच्या या हिम क्षेत्रालाही बसू लागला आहे. तिबेटच्या पठारी क्षेत्रांमध्ये येत्या काही वर्षांमध्ये तापमान अधिकच वाढणार आहे.
याप्रकारचे तापमान वाढ झाली तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा पर्यावरणवाद्यांनी दिला आहे. चीनमधील एक संशोधक चॅन झंग से यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढल्यामुळे तिबेटमधील पठारी क्षेत्रांमध्ये काही दशकांमध्ये तब्बल तीन डिग्री सेल्सिअस तापमान वाढ होण्याची शक्यता आहे . अशाप्रकारे तापमान वाढ झाल्यामुळे हीमक्षेत्र वितळणारच आहेत शिवाय नद्यांचे पाणीही वाढणार आहे. पाकिस्तानातील सिंधू नदी, भारतातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि चीन मधील येलो आणि यांगझे या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याचा धोका आहे. त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे महापुराची संकटेही वाढणार आहेत. अशा प्रकारचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पर्यावरणवादी आणि संबंधित सरकार यांनी त्वरित काही पावले उचलण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आह.े